Cental Bank Of India:नवी दिल्ली : जर तुमचे खाते बॅंकेच्या एखाद्या शाखेत असेल आणि ती शाखाच (Bank Branches) बंद होणार असेल तर चिंता वाटणे स्वाभाविकच आहे. असेच काहीसे एका आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेसंदर्भात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक (PSU Bank) असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India)च्या संदर्भातील ही बातमी आहे. तुमचे बॅंक खाते जर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने मोठ्या प्रमाणात शाखा बंद करण्याचा विचार केला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बँक आपल्या देशभरातील १३ टक्के शाखा बंद करण्याचा विचार करत आहे. (Central Bank Of India to close 600 branches across country, check details)
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, मार्च 2023 पर्यंत आपल्या देशभरातील 600 शाखा बंद करण्याचा किंवा तोट्यात चाललेल्या शाखांचे विलीनीकरण करण्याचा विचार करत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात तब्बल 4594 शाखा आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2017 मध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांना रिझर्व्ह बॅंकेच्या ( RBI)च्या त्वरित सुधारात्मक कृती (PCA) यादीत टाकण्यात आले होते. वाईट आर्थिक स्थितीतून जात असलेल्या बँकांना या यादीत टाकण्यात आले आहे.
या यादीत येणाऱ्या बँकांना अनेक बंधने घालून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देण्यात आली होती. 2018 मध्ये देखील 12 बँकांना RBI च्या PCA आराखड्यामध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्या आराखड्यात 11 सरकारी आणि एक खाजगी बँक होती. ज्यांना अतिरिक्त खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले होते.
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वगळता इतर सर्व बँका पीसीए यादीतून बाहेर आल्या आहेत. परंतु आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सेंट्रल बँक या यादीत राहिली. अशा परिस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने 13 टक्के शाखा बंद करण्याचा विचार केला जात आहे.
अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून पुन्हा मोठी भेट, जुलै मध्ये पुन्हा होणार महागाई भत्त्यात वाढ
देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.40 टक्के वाढ जाहीर केली आहे. रेपो दरातील ताज्या वाढीनंतर आता रेपो दर 4.40 टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता तुमचा कर्जाचा ईएमआय आणखी वाढणार आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 2 आणि 3 मे रोजी पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली ज्यामध्ये रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.