Reliance entity to enter icecream market soon : भारतातील 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आईस्क्रीम उद्योगात मुकेश अंबानींचा रिलायन्स उद्योग समूह प्रवेश करणार आहे. आधी तेल शुद्धिकरण प्रकल्प नंतर जिओद्वारे भारताच्या दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) क्षेत्रात मोठा धमाका केल्यानंतर रिलायन्स उद्योग समूह आईसक्रीम निर्मिती क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी करत आहे.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्टस कंपनी इंडिपेंडेन्स या ब्रँडनेमसह आईस्क्रीम निर्मिती क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. आईस्क्रीम उद्योगात दमदार एन्ट्रीसाठी रिलायन्सची गुजरातमधील एका कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असेही वृत्त आहे.
आईस्क्रीम उद्योगात रिलायन्स आल्याने स्पर्धा वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतातील 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आईस्क्रीम उद्योगात 50 टक्के वाटा संघटित क्षेत्राचा आहे.
भारताच्या आईस्क्रीम उद्योगात हॅवमोर आईसक्रीम्स, वादिलाल इंडस्ट्रीज आणि अमूल या कंपन्यांचा सर्वाधिक वाटा आहे. रिलायन्ससोबत स्पर्धा करण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी वेगाने हालचाली करत असल्याचे वृत्त आहे.
रिलायन्सने काही दिवसांपूर्वी डेअरी सेक्टरमधील आरएस सोधी यांना सोबत घेतले आहेत. सोधी यांना अमूल सोबत काम करण्याचा अनुभव आहे. रिलायन्स पूर्ण तयारीने आईस्क्रीम उद्योगात उतरत आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे.
सावधान, आंबा खाण्याआधी हे वाचा