RBL Bank | मुंबई : सध्या खासगी क्षेत्रातील बॅंक असलेली आरबीएल बॅंक चर्चेत आहे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala)आणि राधाकिशन दमानी (Radhakishan Damani)हे देशातील दोन गुंतवणुकगुरू आरबीएल बॅंकेत (RBL Bank)१० टक्के शेअर खरेदी करू इच्छितात. यासाठी झुनझुनवाला आणि दमानी या दोघांनी रिझर्व्ह बॅंकेकडे अर्ज केला आहे. रिझर्व्ह बॅंक (Reserve Bank of India) या दोघांच्या प्रस्तावावर सध्या विचार करते आहे. आज आरबीएल बॅंकेच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. बॅंकेचा शेअर तब्बल ३० टक्क्यांनी कोसळला आहे. सध्या आरबीएल बॅंकेचा शेअर १४१.२० प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. पाहूया आरबीएल बॅंकेबाबत नेमके काय चालले आहे. (Share price of RBL bank crashes by 30 %, Rakesh Jhunjhunwala & Damani are keen to buy 10 % stake)
आरबीएल बॅंकेचा शेअर गडगडणे, झुनझुनवाला आणि दमानी यांची १० टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी हे सर्व अशा पार्श्वभूमीवर घडते आहे जेव्हा रिझर्व्ह बॅंकेनेच आरबीएल बॅंकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने योगेश दयाल यांची नियुक्ती बॅंकेच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालक म्हणून केली आहे. याचबरोबर आरबीएल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव आहूजा यांनी राजीनामा दिला आहे. योगेश दयाल हे देशातील जुने, अनुभवी बॅंकर आहेत. त्यांचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. शिवाय योगेश दयाल सध्या रिझर्व्ह बॅंकेचे कम्युनिकेशन इंचार्जदेखील आहेत. राजीव दयाल यांची आरबीएल बॅंकेवरील नियुक्ती २४ डिसेंबरला करण्यात आली आहे आणि ती २३ डिसेंबर २०२३ पर्यत असणार आहे.
आरबीएल बॅंकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक असलेले राजीव आहूजा यांनी बॅंकेच्या आर्थिक स्थितीबाबतच्या शंका दूर करताना म्हटले आहे की डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत बॅंकेला सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीच्या तुलनेत अधिक नफा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने योगेश दयाल यांना आरबीएल बॅंकेचे अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केल्यानंतर विश्ववीर आहूजा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बॅंकेच्या संचालक मंडळाने राजीव यांना अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. आरबीआयकडून बॅंकेने यासंदर्भात परवानगी घेतली आहे.
विश्ववीर आहूजा यांचा मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा सहा महिन्यांच्या कार्यकाळ बाकी होता. अशा परिस्थितीत ते अचानक सुट्टीवर गेल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजीव आहूजा यांनी सांगितले की विश्ववीर वैद्यकीय कारणांमुळे पदावरून बाजूला झाले आहेत. त्यांच्या पदावरून हटण्याचा आणि बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा कोणताही संबंध नाही. डिसेंबरअखेर बॅंकेला आधीच्या तिमाहीच्या तुलनेत जास्त नफा होणार आहे. राजीव पुढे म्हणाले की आम्हाला प्रशासन, डिजिटल सेवा आणि जोखमीची क्षेत्रे यावर लक्ष द्यावे लागेल. बॅंकेकडे १५,००० कोटी रुपयांची चलन तरलता आहे आणि ग्राहकांपर्यत अधिक सक्षमपणे पोचण्यासाठी बॅंकेने पावले उचलली आहेत. मार्च २०२२ पर्यत आरबीएल बॅंक आपल्या थकित कर्जाचे प्रमाण २ टक्क्यांनी कमी करणार आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बॅंकेच्या मायक्रो फायनान्सशी संबंधित कारभारात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. यामुळे बॅंकेच्या नफ्यावरदेखील परिणाम झाला आहे. अर्थात बॅंकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. सप्टेंबअखेर बॅंकेला एकूण ३१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर वार्षिक आधारावर या तिमाहीत बॅंकेच्या नफ्यात ७८ टक्के घट झाली होती. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बॅंकेचे थकित कर्जाचे प्रमाण ५.४ टक्के होते. जूनअखेर बॅंकेचा नॉन परफॉर्मिंग रेशो ४.९९ टक्के होता. सप्टेंबर अखेर बॅंकेच्या भांडवलाच्या उपलब्धीचे गुणोत्तर १६.३ टक्के होते. एक वर्षाआधी हाच रेशो १६.५ टक्के होता.