मुंबई : येत्या १ डिसेंबर २०२० पासून सामान्य नागरिकांशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. यामध्ये आरटीजीएस, रेल्वे आणि स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्व सामन्यांच्या जीवनावर होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रास सेटलमेंटशी (आरटीजीएस) संबंधित नियमांमध्ये बदल केले असून ते एक डिसेंबरपासून लागू होणार आहेत. याचबरोबर इतरही काही नियम बदलणार आहेत. जाणून घेऊयात या बदलणाऱ्या नियमांबद्दल...
आरटीजीएस सुविधेचा फायदा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये बँकांचे काही नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रास सेटलमेंटशी (आरटीजीएस) संबंधित व्यवहार वर्षातील सर्व दिवस २४ तास उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय एक डिसेंबर २०२० पासून अंमलात येणार आहे.
रिझर्व्ह बँकने आरटीजीएसची सेवा २४ तास उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांना फायदा होणार असून इतर व्यवहारांप्रमाणे आता ग्राहकांना कधीही आरटीजीएसच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहे. सध्याच्या नियमांनुसार आरटीजीएसने पैसे पाठवण्याची सुविधा महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील कामाकाजाच्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या दरम्यान उपलब्ध आहे. मात्र उद्यापासून ही इतर ऑनलाइन मनी ट्रान्फर सेवांप्रमाणे कायम सुरु राहणार आहे.
पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल > एक डिसेंबपासून पीएनबी २.० (पीएनबी, ईओबीसी, ईयूएनआय) वन टाइम पासवर्डवर (ओटीपी) आधारित पैसे काढण्याची (कॅश विड्रॉअल) सुविधा सुरु करणार आहे. एक डिसेंबरापासून रात्री आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पीएनबी २.० एटीएममध्ये एकाच वेळेस १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी बेस व्यवहार करावे लागलीत.
पीएनबी एटीमच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी नाईट अवर्समध्ये १० हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढायचे असल्यास ग्राहकांना ओटीपी आवश्यक असणार आहे. त्यामुळेच नाईट अवर्समध्ये पैसे काढताना आता ग्राहकांना मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे.
आता पाच वर्षांनंतर विमा ग्राहक प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी करु शकतात. म्हणजेच १ डिसेंबर २०२० पासून एखादी विमा पॉसिली विकत घेतल्यानंतर पाच वर्षानंतर त्या पॉलिसीच्या प्रीमियमची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करुन ती ग्राहकांना सुरु ठेवता येणार आहे.
भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२० पासून रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. करोना लॉकडाउननंतर अनेक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. आता एक डिसेंबरपासून काही विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
यामध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोन महत्वाच्या ट्रेन्सचाही समावेश आहे. दोन्ही ट्रेन्समध्ये सामान्य श्रेणीचे डब्बे असतील. ०१०७७/७८ पुणे-जम्मूतावी पुणे झेलम स्पेशल आणि ०२१३७/३८ मुंबई फिरोजपूर पंजाब मेल या दोन विशेष गाड्या रोज चालवण्यात येणार आहेत.
१ डिसेंबर २०२० पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीसंदर्भात प्रमुख बदल होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा केली जाते. यंदाही डिसेंबरच्या सुरुवातीलाच गॅसच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
देशभरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये या दरांमध्ये कोणताच बदल करण्यात आला नव्हता.