नवी दिल्ली : एका हिंदी सीरियलमधून घरात घरात पोहोचलेला स्मृती इराणी हा चेहरा आज, देशभरात चर्चेत आहे. त्यावेळी केवळ हिंदी पट्ट्यात त्यांची चर्चा होती. आता केरळपासून काश्मीरपर्यंत हे नाव चर्चिले जात आहे. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून अमेठी मतदारसंघातचा उल्लेख केला जायचा, त्या मतदार संघात गांदी घराण्याच्याच व्यक्तीला पराभूत करण्याची किमया स्मृती इराणी यांनी साधली आहे. विरोधी पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्याच पारंपरिक मतदारसंघात धूळ चारण्याच्या काही मोजक्याच घटना देशात घडल्या असाव्यात, त्यात स्मृती इराणींचा राहुल गांधींवरचा विजय उल्लेखनीय मानावा लागेल. राहुल यांनी अमेठीमधला आपला पराभव मान्य केला असून, त्यांनी स्मृती इराणींचे अभिनंदन करत त्यांना अमेठीमध्ये काम करण्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या आयुष्यातील एक किस्सा इथं नमुद करावासा वाटतो. एका ज्योतिषाने त्यांची कुंडली पाहून त्या आयुष्यात फार काही करू शकणार नाहीत, असं भविष्य सांगितलं होतं. त्याला छेद देत स्मृती इराणी यांनी टेलिव्हिजन सीरियल आणि त्यानंतर राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजचा स्मृती इराणींचा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतले शिखर मानले जात आहे.
एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या सीरियलमधून स्मृती इराणी यांना ओळख मिळाली. सीरियलमधील तुलसी विरानी या नवानेच त्यांनी ओखळ झाली होती. पण, भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. सुरुवातीला दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना लढत दिली होती. त्यानंतर अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात त्या उभ्या होत्या. पण, लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाची चवच चाखायला लागली होती. केंद्रात मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेतून संसदेत प्रवेश केला आणि मनुष्यबळ विकासमंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
स्मृती इराणी लाहन असताना त्यांच्या आई-वडिलांनी एका ज्योतिषाला त्यांची जन्म पत्रिका दाखवली होती. त्यावेळी स्मृती इराणीही उपस्थित होत्या. ज्योतिषाचे भविष्य ऐकून, स्मृती इराणी यांनी त्यांना आव्हान दिले. तुम्ही मला दहा वर्षांनंतर भेटा, असे त्यांनी ज्योतिषाला सांगितले होते. स्मृती तसेच त्यांच्या आई-वडिलांना तिच्यासाठी कोणतं करिअर चांगलं असेल हे कळत नव्हते. त्या परिस्थितीत स्मृती इराणी यांनी आपली बॅग भरून मुंबई गाठली. एक आव्हान स्वीकारून त्यांनी अभियन क्षेत्रात नशीब आजमावण्यास सुरुवात केली. स्मृती इराणी एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील एक कुरिअर कंपनी चालवतात. १९९७ मध्ये स्मृती इराणी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत होत्या.