नवी दिल्ली: सध्या दिल्लीमध्ये बहुतेक सरकारी कर्मचारी इलेक्शन ड्युटी का नको? याचे बहाणे शोधतांना दिसत आहेत. सरकारी कर्मचारी लोकसभा इलेक्शन ड्युटीसाठी आपलं नाव कमी करावं म्हणून पूर्व दिल्ली आणि उत्तर-पूर्व दिल्ली निवडणूक कार्यालयात रोज चकरा मारत आहेत. आतापर्यंत सुमारे पाचशे कर्मचाऱ्यांनी आपलं नावं इलेक्शन ड्युटीमधून कमी करावं यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जात बहुतेकांनी आजारपणाची कारण दिलेली आहेत. काहींनी तर अशी विचित्र कारणं दिली आहेत की त्यांची कारण ऐकून अघिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एका कर्मचाऱ्यानं तर, “माझी एकुलती एक मेव्हणी आहे आणि मला तिच्या लग्नाला जायचं आहे. त्यामुळे मी इलेक्शन ड्युटी करू शकत नाही” असं कारण दिलंय. तर एकानं “बायको गरोदर आहे, केव्हाही बाळंतीण होऊ शकते, तिचा सांभाळ करायला माझ्याशिवाय कोणी नाही. त्यामुळे माझं नाव इलेक्शन ड्युटीवरून काढून टाका” हे कारण दिलं आहे. डीएम, एडीएम आणि एसडीमए रँकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रत्येक तिसरा कॉल हा इलेक्शन ड्युटी का नको हे सांगण्यासाठी असतो. त्यामुळे ते खूप वैतागले आहेत.
‘इलेक्शन ड्युटी नको’ च्या मागणीमध्ये सगळ्यात जास्त संख्या महिलांची आहे. विशेष म्हणजे यंदा पोलिंग बूथवर एक महिला कर्मचारी असणं अनिवार्य असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. जेणेकरून महिला मतदातांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यातील भयंकर उन्हापासून वाचण्यासाठी इलेक्शन ड्युटीमधून आपलं नाव कमी करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
एसडीएम इलेक्शन पूर्व दिल्ली संदीप दत्ता यांनी सांगितलं की, आपलं नाव इलेक्शन ड्युटीमधून कमी करण्यात यावं यासाठी आतापर्यंत अनेकजणांचे अर्ज आले आहेत. पूर्व जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार कर्मचाऱ्यांची नावं काढण्यात आली आहेत. कारण ते गंभीर आजारांनी त्रस्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण इतरांची नावं काही ठोस कारणं असल्याशिवाय ड्युटीतून कमी करण्यात येणार नाही. तर, एडीएम उत्तर-पूर्व व असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर एम के द्विवेदींनी सांगितलं की, त्यांच्याकडेही अनेक अर्ज येत आहेत. पण अजूनही कोणालाही ड्युटीतून कमी करण्यात आलेलं नाही. पोलिंग बूथवरील संख्यापूर्ण होईल त्यानंतर विचार केला जाईल.