नाशिक: २०१४ लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून भाजप-शिवसेनेला घवघवीत यश मिळालं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देखील असंच यश पुन्हा मिळेल अशी युतीला आशा आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील बराच प्रचार केला आहे. त्यामुळे यंदा येथे युती आणि आघाडीमध्ये थेट आणि तितकीच आक्रमक लढत पाहायला मिळू शकते. या विभागात ८ मतदार संघ आहेत. त्यामुळे या आठ पैकी युतीच्या पारड्यात किती जागा येतात यावर बरंचसं गणित अवलंबून आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अशीही चर्चा आहे की, यंदा काही धक्कादायक निकाल येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या विभागातील सर्व मतदारसंघाचे अपडेट आणि अंतिम निकाल आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
नाशिक | अहमदनगर |
जळगाव | धुळे |
रावेर | दिंडोरी |
शिर्डी | नंदूरबार |
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ हा अहमदनगर आहे. कारण या मतदारसंघातील उमेदवारावरून बरंच राजकारण रंगलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून बराच राजकीय धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे या मतदार संघातील निकालावर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे नाशिक. कारण या मतदारासंघातून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे निवडणूक लढवणार आहेत. तसंच या मतदारसंघाची एक अशीही खासियत आहे की, येथे एकदा निवडून आलेला खासदार हा पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आल्यास मोठा विक्रम रचू शकतात. तर दुसरीकडे भुजबळांनी देखील येथे बराच जोर लावला आहे.