मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, मंत्रिमंडळाने १६वी लोकसभा केली बरखास्त

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 24, 2019 | 22:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

लोकसभा निवडणुकीत प्रंचड मोठा विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत १६वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव पारित केला.

PM_Modi_TWITTER
मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजप प्रणित एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १६वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. पुढील सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. राष्ट्रपतींनी देखील त्यांचे राजीनामे हे स्वीकारले. 

राष्ट्रपती भवनमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी, मंत्रिमंडळ यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपला राजीनामा सोपावला. त्यानंतर राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा स्वीकारला. पण नवं सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना पदावर कायम राहण्याचा आग्रह देखील केला. त्यामुळे आता नवं सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधान मोदींना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. 

याआधी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याच बैठकीत १६ वी लोकसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची ही बैठक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्याच्या तात्काळ दुसऱ्या दिवशी घेण्यात आली. या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला अतिशय जबरदस्त असं यश मिळालं. 

१६व्या लोकसभेचा कार्यकाळ हा ३ जून २०१९ रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे १७ व्या लोकसभेचं गठन हे ३ जूनच्या आधी करणं क्रमप्राप्त आहे. नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया आता पुढील काही दिवसातच सुरू होईल. पण त्याआधी तीन निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींची भेट घेतील आणि ते नवनिर्वाचित खासदारांची यादी ही त्यांना सोपवतील. 

लोकसभा निवडणूक २०१९मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने अतिशय भरघोस यश मिळवलं. यावेळी एकट्या भाजपने ३०० हून अधिक जागा मिळवल्या. तर एनडीएने ३५२ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि एनडीएच्या पदरात फक्त ८७ जागा आहेत. त्यामुळे २०१४ प्रमाणेच जनतेने काँग्रेसवर फारसा विश्वास दाखवलेला नाही. आता येत्या काही दिवसातच नवं सरकार स्थापन केलं जाईल. तसंच या सरकारच्या मंत्रिमंडळात आता काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता देखील आहे. तसंच महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येणार याकडे देखील महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी