जयपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. मतदारांनी बहुमतांने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला आहे. केंद्रात पुन्हा एकदा भक्कम सरकार स्थापन होत आहे. सलग दुसऱ्या बिगर काँग्रेसी भक्कम सरकार स्थापन होण्याची ही भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. आता या भक्कम सरकारच्या निर्णयक्षमतेवर कोणी शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. त्यामुळेच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा पुढे करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजस्थानमध्ये एका सभेत पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. उदयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ‘रामाचे काम करायचे आहे आणि ते होणारच’, असे सूचक वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य राम मंदिराशी संबंधितच होते, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, मोहन भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये राम मंदिर असा थेट उल्लेख केला नाही. त्यामुळे त्याविषयी स्पष्ट सांगता येत नसल्याचे म्हटले जात आहे. कदाचित ते राम राज्य या विषयावर बोलत असावेत, असाही अंदाज लावला जात आहे. पण, उदयपूरच्या या सार्वजनिक कार्यक्रमात मोहन भागवत यांनी जे काही सांगितले त्यानुसार, लोकशाही मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर स्थापन होत असलेल्या नव्या सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बारीक नजर असणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मोहन भागवत म्हणाले, ‘आपल्याला रामाचे काम करायचे आहे आणि ते होणारच आहे. हे आपले काम आहे. राम आमच्या मनात जिवंत आहे. त्यामुळेच हे आपले काम आहे आणि ते आम्ही स्वतः करणार. आता हेच काम आपण दुसऱ्याला करायला दिले असेल तर आम्ही त्यावर बारीक नजर ठेवू.’
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्ट बहूमत मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' हा संदेश दिला आहे. त्याचवेळी त्यांनी शनिवारी एनडीएच्या सदस्यांना संबोधित करताना अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याचे सविस्तर विवेचन केले. पण, त्यात त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्याचा कोठेही उल्लेख केला नाही. त्यामुळेच कदाचित मोहन भागवत यांनी दुसऱ्याचं दिवशी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून सरकारला आठवण करून दिली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. कारण, भाजपच्या या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.