Akshay Kumar Films | अक्षय कुमार (Akshay Kumar) एकाच वेळी अनेक सिनेमांत (Multiple projects) काम करत असतो. दरवर्षी त्याचे चार ते पाच चित्रपट रीलिज होतात. मात्र सतत बिझी असल्यामुळे त्याचं कुठल्याच सिनेमात पूर्ण लक्ष राहत नाही, असं निर्मात्यांचं मत होऊ लागलं आहे. सिनेमांचा आकडा वाढवण्याच्या नादात कामाच्या दर्जावर परिणाम होऊ लागल्यामुळे आता अक्षय कुमारसोबत काम करण्याचा निर्मात्यांचा विश्वास कमी होतोय की काय, असं चित्र निर्माण झालं आहे.
उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड सरकारनं अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट टॅक्स फ्री केला होता. मात्र तरीही त्याचा कुठलाही फायदा चित्रपटाला होऊ शकला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करू शकला नाही आणि अधिकृतरित्या फ्लॉप झाला. त्यापूर्वी अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा सिनेमादेखील फ्लॉप ठरला होता. यामुळे आता भविष्यातील प्रोजेक्टसाठी केलेल्या गुंतवणुकीतून निर्माते माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या गोरखा सिनेमाचं चित्रिकरण सध्या थांबवण्यात आलं आहे. साऊथचा फिल्म स्टार सूर्या आणि अक्षय कुमार यांचा एकत्र चित्रपट येणार होता. मात्र सूर्यानं सध्या हा प्रोजेक्ट लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. यशराज फिल्म्सच्या धूम 4 मध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणार होती. मात्र सम्राट पृथ्वीराजची अवस्था पाहून निर्माते त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करत असल्याची चर्चा आहे.
आतापर्यंत संख्येवर म्हणजेच क्वांटिटीवर भर देणाऱ्या अक्षय कुमारनं आता क्वालिटीवर म्हणजेच कामाच्या दर्जावर जोर देणं गरजेचं असल्याची चर्चा आहे. सम्राट पृथ्वीराज सिनेमातील त्रुटी पाहता ऐतिहासिक चित्रपट करत असताना कलाकारांनी त्याकडे पूर्ण लक्ष देणं आणि मेहनत घेणं गरजेचं का असतं, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. त्या पात्राचा पूर्ण अभ्यास करणं आणि त्याच्या भूमिकेत शिरणं ही अशा चित्रपटांची मूलभूत गरज असते. मात्र एकाचवेळी अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे तितका अभ्यास करायला कलाकारांना वेळच मिळत नसल्याचं दिसतं.
एकाच वेळी अनेक चित्रपट करून बक्कळ पैसे कमवायचे की एका वेळी एका प्रोजेक्टवर पूर्ण लक्ष देऊन यशस्वी चित्रपट निर्माण करायचे, याचा फैसला आता अक्षय कुमारला करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षात अक्षय कुमार हा निर्मात्यांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. अक्षय कुमारला घ्या आणि चित्रपट हिट होण्याची हमी मिळवा, असंच चित्र गेल्या काही वर्षात निर्माण झालं होतं. मात्र आता प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत. अक्षय कुमार या अपेक्षा पूर्ण करणार का, हे येत्या काळात समजेलच.