मुंबई: झी मराठीवरील लागिरं झालं जी ही मालिका काही दिवसांपूर्वी संपली. या मालिकेतील मुख्य जोडी शीतली आणि अजिंक्यनं आपल्या अभिनयानं आणि केमिस्ट्रीनं साऱ्यांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेत शीतलीची भूमिका साकारली होती ती शिवानी बावकर हिने. या मालिकेतील शीतलीचा बिनधास्त अंदाज प्रेक्षकांना फारच आवडला होता.
या मालिकेला सैन्याची पार्श्वभूमी होती. या मालिकेतील हिरो म्हणजे आज्या देशप्रेमानं भारावलेला तर दुसरीकडे शीतली एखाद्यावर जीवापाड प्रेम करणारी. अशा या प्रेमाची ही कहाणी होती लागिरं झालं जी. साताऱ्यासारख्या छोट्याशा गावातील एक तरूण ज्याला देशप्रेमाचे प्रचंड वेड आहे, त्या प्रेमाने तो भारावून गेला आहे असा अजिंक्य सैन्यामध्ये भरती होण्यासाठी नानापरी प्रयत्न करत असतो त्यात तो यशस्वी होतोही. यातच त्याचे आणि शीतलीचे सूर जुळतात. दोघांचे लग्नही होते अशीच कहाणी पुढे सरकते.
या मालिकेत शिवानी बावकरने शीतलीची भूमिका जबरदस्त साकारली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता शीतली म्हणजेच शिवानी काय करणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शिवानी लवकरच आणखी एका मालिकेत दिसणार आहे. झी मराठीच्या अलटी पलटी या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती एका चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना शिवानी म्हणाली, टीव्ही अथवा कोणत्याही माध्यमात मला अभिनय करायचा आहे. शीतलच्या भूमिकेने मला कामाचे समाधान दिले. आता हे नवे आव्हान पेलायचे आहे.
दरम्यान, या मालिकेची माहिती अद्याप गुलदस्यात ठेवण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत शिवानीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लवकरच आपण भेटत आहोत पुन्हा एकदा. मी खूप आनंदी आणि एक्सायटेड आहे. अलटी पलटी. असे तिने म्हटले आहे.
लागिरं झालं जी मालिकेने शीतलला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेमुळे ती घरांघरात पोहोचली. तसेच तिच्या चाहत्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. तिला लोक ओळखू लागले. या शीतली अत्यंत जिद्दी दाखवली होती. आपल्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार अशी ही शीतली होती. दरम्यान, शीतलीचा अंदाज हा गावरान होता. त्यामुळे शिवानीला तेथील स्थानिक भाषाही शिकावी लागली. शिवानीचे शिक्षण मुंबईत झाल्याने तिला ही भाषा विशेष शिकावी लागली. तो लहेजा शिकावा लागला. सुरूवातीला ते तिच्यासाठी नक्कीच अवघड होते. मात्र शीतलीसाठी ते काही अवघड नव्हते. हळूहळू तेथील भाषा शिकली आणि पारंगतही झाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. अभिनयातही ती हळूहळू पारंगत होत गेली. तिची अजिंक्यसोबच अत्यंत भन्नाट केमिस्ट्री जुळून आली होती.