bollywood actor akshay kumar apologises for vimal elaichi advt steps back after heavy trolling : मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने जाहीर माफी मागितली. 'विमल इलायची' या उत्पादनाच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात ट्रोलिंग सुरू झाले. यानंतर अक्षयने जाहीर माफी मागितली. याआधी शाहरूख खान आणि अजय देवगण या दोन बॉलिवूड अभिनेत्यांनी विमल कंपनीच्या उत्पादनासाठी जाहिराती केल्या. पण या दोघांना कधीही ट्रोलिंग सामोरे जावे लागले नाही. या उलट अक्षयला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.
माफी मागताना भविष्यात पु्न्हा तंबाखूच्या उत्पादनाची जाहिरात करणार नाही, अशी घोषणा अक्षय कुमारने केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून अक्षयने ही घोषणा केली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची इन्स्टाग्राम पोस्ट : मला माफ करा. मी आपणा सर्वांची माफी मागू इच्छितो अगदी माझे चाहते आणि शुभेच्छुक यांचीही. मागील काही दिवसांतील आपल्या प्रतिक्रियांचा परिणाम माझ्यावर झाला आहे. आपल्या विचारांचा आणि भावनांचा मी आदर करतो. यामुळे विनम्रतेने माघार घेत आहे.
मी निर्णय घेतला आहे की, या जाहिरातीमधून मिळालेल्या पैशांचा वापर एखाद्या चांगल्या कामासाठी करेन. ब्रँड कराराची मुदत संपेपर्यंत ही जाहिरात दाखवू शकेल. पण भविष्यात करार करताना मी जास्त खबरदारी घेईन. या बदल्यात आपल्याकडून कायमच प्रेम आणि आदर मिळावा एवढीच सदिच्छा बाळगतो.
'विमल इलायची' या उत्पादनाच्या जाहिरातीत शाहरूख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार हे तीन बॉलिवूड कलाकार दिसतात. शाहरूख आणि अजय अक्षयचे विमल युनिव्हर्समध्ये स्वागत करताना दिसतात. ही पहिली अशी जाहिरात आहे ज्यात बॉलिवूडचे तीन कलाकार एकत्रितपणे तंबाखूच्या उत्पादनाची जाहिरात करत आहेत.
अक्षय कुमारला पद्म पुरस्कार मिळाला आहे. तसेच अक्षयने काही सरकारी जाहिरातींमधून धूम्रपान करू नका अशा स्वरुपाचे आवाहन केले आहे. एकीकडे तंबाखूच्या उत्पादनांच्या विरोधात बोलायचे आणि नंतर तंबाखूच्याच उत्पादनाची जाहिरात करायची या प्रकारामुळेच अक्षय कुमारचे सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले. ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर अक्षयने इन्स्टा पोस्ट करून माफी मागितली.