मुंबई : ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) पहिला सुपर डुपर हिट चित्रपट 'कहो ना प्यार है' (Kaho Na Pyaar Hai) या शीर्षक गीतचे गीतकार (lyricist) अब्राहम अश्क (Ibrahim Ashq) यांचे रविवारी कोरोनामुळे (Corona Viras) मुंबईत निधन झाले आहे. अब्राहम अश्क यांची धाकटी मुलगी मुसफा खान हिने अब्राहम अश्क यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी सायंकाळी 4.00 वाजता मीरा रोड येथील मेडीटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अब्राहम अश्क यांचे निधन झाले आहे.उद्या सकाळी 9 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कहो ना प्यार है' व्यतिरिक्त 70 वर्षीय अब्राहम अश्क यांनी 'कोई मिल गया', 'क्रिश', 'वेलकम' 'ऐतबार', 'जानशीन', 'ब्लॅक अँड व्हाईट', 'आप मुझे अच्छे लगने लगे' 'बॉम्बे टू बैंकॉक' अशा अनेक सिनेमांची गाणी लिहिली आहेत. विशेष म्हणजे चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याबरोबरच मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात जन्मलेले इब्राहम अश्क हे उत्तम कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जात होते.
अश्क यांच्याविषयीची माहिती देत मुसफा खान म्हणाली, शनिवारी सकाळी बाबांना खूप खोकला होता. तसेच रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर आज त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'दैनिक इंदौर समाचार' या वृत्तपत्रात काम करण्यासोबतच त्यांनी अनेक मासिकांसाठीही काम केले आहे.