मुंबई: बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेलाला न्यायालयाकडून काही दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्याला आणखी काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार आहे. बिचुकलेच्या केसबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. बिचुकलेने तुरूंगातून बाहेर येण्यासाठी जामिन अर्ज याचिका दाखल केली होती. न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायलयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे बिचुकलेला काही जामीन मिळाला नसल्याने त्याला तुरुंगातच राहवे लागणार आहे.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात अभिजीत बिचुकलेचा समावेश करण्यात आला होता. बिग बॉसच्या घरात बिचुकले नेहमीच चर्चेत राहत असे. तो या स्पर्धेचा तगडा प्रतिस्पर्धी होता. बिग बॉसमधील खेळ रंगात येत असतानाच २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकलेला अटक करण्यात आली. त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये त्याला २२ जूनला जामिनही मिळाला. मात्र त्याच्या अडचणी काही संपता संपेना. त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्याला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावे लागले.
अटक केल्यानंतर बिचुकलेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली की, मला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचा हा कट होता. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने हा राजकीय कट आखण्यात आला.
अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याचे बिग बॉसच्या घरात परतणे मुश्किल झाले आहे. त्याला जामीन मिळाला असता तर बिग बॉसच्या घरात त्याची घरवापसी शक्य होती. मात्र आता तो बिग बॉसच्या घरात कधी परतणार, दरम्यान, परतणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक झाल्यानंतर बिग बॉस मराठी १ची विजेती मेघा धाडेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. बिचुकलेसारख्या माणसाला अटक झाल्याचा आनंद होत असल्याचे मेघा म्हणाली होती. कार्यक्रम पाहत असताना माझे रक्त खवळते. महिलांशी ज्या पद्धतीने बिचुकले वागतो आहे विशेषत: रूपालीसोबत ते अत्यंत असभ्य आणि लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया मेघाने दिली होती. तसेच असा माणूस घरात असणे म्हणजे कलंक आहे. तो घराची शान घालवत आहे. स्वत:ला फार मोठा नेता समजतो. आतापर्यंत या माणसाने एक निवडणूक जिंकी नाही. चार टवाळक्या करणाऱ्या पोरांना घेऊन फिरणे म्हणजे नेतागिरी वाटते. जो म्हणतो माझ्या घरात ३०० नोकर आहेत तर मीडियाने याच्या घरात जाऊन पहावे की ३०० नोकर खरंच आहेत का? हा फ्रॉड आहे, अशा शब्दात त्याने आपला संताप व्यक्त केला होता.