Lokmanya Tilak Birth Anniversary : मुंबई : भारतीय असंतोषाचे जनक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी नेते. टिळकांची ओळख फक्त स्वातंत्र्य सैनिक म्हणून इतकीच सिमीत नाही. स्वराज्याचे आग्रही, यशस्वी संपादक, थोर समाजसुधारक अशीही त्यांची ओळख आहे.
टिळकांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांना दोनदा राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ज्या लिखाणामुळे टिळकांनी राजद्रोहाची शिक्षा भोगली त्यापैकी बहुतांश लेखन टिळकांचे नव्हतेच. संपादक म्हणून टिळकांनी त्या लेखनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. मराठी विश्वकोश खंड 17 वा आणि रा.के.लेले यांनी मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या पुस्तकात ही बाब नमूद केली आहे.
मराठी विश्वकोशातल्या मराठी वृत्तपत्र या नोंदी प्रसन्न अकलूजकर म्हणतात 15 जून 1897 रोजी शिवाजीचे उद्गार या कवितेमुळे पहिल्यांदा राजद्रोहाची दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर 1904 मध्ये राष्ट्रीय स्वांतत्र्य चळवळीचा जोर वाढल्याने टिळकांचे केसरीतील लेखन अधिक आक्रमक होत गेले. 24 जून 1908 रोजी टिळकांना पुन्हा राजद्रोहाची शिक्षा झाली. यावेळी ज्या लिखाणासाठी टिळकांना राजद्रोहाची शिक्षा सुनावण्यात आली ते लेखन नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे होते. परंतु टिळक केसरीचे संपादक होते. संपादक या नात्याने टिळकांनी या लेखनाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनीच मंडाले येथे राजद्रोहाची शिक्षा भोगली.
रा.के.लेले यांनी मराठी वृत्तपत्राचा इतिहास या ग्रंथात विस्तृत विवेचन केले आहे. 1908 साली टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला. त्यात आठ लेख सरकारतर्फे अक्षेपार्ह म्हणून सादर करण्यात आले होते त्या लेखन पैकी तीन टिळकांचे व पाच लेख खाडिलकर यांचे होते. दुहेरी इषारा, बॉम्बगोळ्याचा खरा अर्थ, बॉम्बगोळ्यांचे रहस्य, हे उपाय टिकाऊ नाहीत आणि स्फुट सूचना हे पाच लेख खाडिलकरांनी केसरीसाठी लिहिले होते. 1897 आणि 1908 अशा दोन्ही खटल्यात टिळकांच्या लेखनाबरोबरच खाडिलकरांचे लेखही अक्षेपार्ह म्हणून सरकार तर्फे पुढे आणले जावे ही गोष्ट खाडिलकर, टिळकांच्या विचारांशी व लेखनशैलीशी कसे समरस झाले होते ते स्पष्ट करते.
अधिक वाचा : Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप
संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १७
मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा.के.लेले