Toxic Relationship : एकमेकांशी असणारं नातं (Relations) ही जगातील सर्वात मौल्यवान बाब असल्याचं सांगितलं जातं. विशेषतः पती-पत्नीचं नातं (Husband and Wife) हे जन्मभराचं आणि सर्वात खास नातं मानलं जातं. या नात्यात जोपर्यंत विश्वास, प्रेम आणि एकमेकांबाबतची सद्भावना असते, तोपर्यंत हे नातं जगातील सर्वात सुंदर नातं ठरतं. मात्र अनेकदा काही काळाने नात्यांमधील ओलावा संपून कोरडेपणा (Dry relations) यायला सुरुवात होते. दैनंदिन आयुष्याच्या गडबडीत या बाबींकडे आपलं लक्ष जात नाही. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अशी नाती अधिकाधिक कडवट व्हायला सुुरुवात होते. अशा काही बाबी आपल्या वागण्यात आणि संवादात आढळू लागतात, ज्या नाती बिघडत असल्याची प्राथमिक लक्षणं (Symptoms) असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन त्यावर उपाय केले नाहीत, तर नाती तुटण्याची शक्यता असते. त्यासाठी नेमकी कुठली लक्षणं नातं बिघडत चालल्याचे संकेत देतात, ते पाहूया.
एकत्र राहणाऱ्या कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये मतभेद आणि छोटी-मोठी भांडणं ही होतच असतात. मात्र तुम्ही जर सतत प्रत्येक गोष्ट एकमेकांशी ओरडून बोलत असाल आणि तुमचा नॉर्मल संवाद बंद पडला असेल, तर हे तुमच्या नात्यातील गोडवा संपत चालल्याचं लक्षण आहे. जेव्हा नात्यात ओलावा राहत नाही, तेव्हा आपल्या पार्टनरच्या प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागतो आणि त्याच्याशी कुठल्याही विषयावर बोलताना आरडाओरडा होण्याची शक्यता असेल. तुमच्या बाबतीत असं होत असेल तर वेळीच सावध व्हा आणि असं होण्याच्या कारणांचा विचार करा.
जर तुम्ही एकमेकांना सपोर्ट करत नसाल, प्रत्येक विचार आणि कृतीला विरोध करत असाल तर तेही नात्यात कडवटपणा येऊ लागल्याचंच लक्षण आहे. अशा वेळी शांतपणे समोरासमोर बसून असं का होत असावं, याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या पार्टनरचा सपोर्ट कमी झाल्यामुळे व्यक्तीला एकाकी वाटू लागत असेल, तरीही ते नात्यातील ओलावा कमी झाल्याचं लक्षण आहे.
अधिक वाचा - बायकांच्या या तीन सवयींमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं वैवाहिक आयुष्य, आजच बदला तुमचं वागणं
जर तुम्ही एकमेकांशी स्पर्धा करून लागतात आणि तुमच्या पार्टनरच्या यशामुळे तुमचा जळफळाट होत असेल, तर तुम्ही चांगले पार्टरन उरलेले नसता. पार्टरनच्या यशाची असूया वाटणे ही निगेटिव्ह भावना आहे. चांगल्या नात्यात आपल्या जोडीदाराला मिळालेल्या यशाकडे पाहून आनंद होत असतो. मात्र तुम्हाला याच्या उलट भावना निर्माण होत असतील, तर त्यावर बारकाईने विचार करण्याची गरज आहे.
जर तुमचा पार्टनर नातेसंबंधात फसवणूक करत असेल, चिटिंग करत असेल तर ते नातं कडवडपणाकडे झुकू लागल्याचंच लक्षण आहे. आपल्या मित्रांबाबतची माहिती लपवून ठेवणे, इतरांसोबत विवाहबाह्य संबंध लपवून ठेवणे, वारंवार खोटं बोलणे, आपला फोन लपवून ठेवणे यासारख्या गोष्टी नातेसंबंध खराब होत चालल्याचं लक्षण मानलं जातं. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेण्याची गरज असते.
एकमेकांना तुम्ही सतत टाळत असाल, गप्पागोष्टी करण्यातील तुमचा रस कमी होत असेल तर तुमचं एकमेकांवरचं प्रेम आटत चालल्याचं ते लक्षण आहे. सातत्याने असं होत असेल तर तुम्हाला या नात्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
डिस्क्लेमर - नातेसंबंधांबाबतची ही सामान्य निरीक्षणं आणि टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.