Holika Dahan 2022 : Significance, Puja Vidhi, Timings and Other Details of Holi Celebrations : होळी हा हिंदू धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे. वाईटाचा विनाश आणि चांगल्याची सुरुवात करण्याचा संदेश देण्यासाठी होळी साजरी करतात. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंद होळीच्या निमित्ताने साजरा केला जातो.
होळी सणाची सुरूवात हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन करून केली जाते. यंदा १७ मार्च २०२२ रोजी होळी आहे. तर होळीचा दुसरा दिवस अर्थात १८ मार्च २०२२ या दिवशी धुळवड आहे. फाल्गुन पंचमी हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. यंदा २२ मार्च २०२२ रोजी रंगपंचमी आहे.
सध्या होळाष्टक सुरू आहे. होळाष्टक संपेल आणि होळी सणाचा आरंभ होईल. गुरुवार १७ मार्च २०२२ रोजी हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन करून होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात होणार आहे. संध्याकाळी होळी पेटवली जाते. होळीची पूजा करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवाशी पेटत्या होळीत मनातील सारे विनाशकारक, संहारक विचार जाळण्यासाठी प्रतिकात्मक पूजा केली जाते.
पंचागानुसार १७ मार्च रोजी रात्री ९ वाजून ६ मिनिटे ते १० वाजून १६ मिनिटांपर्यंत होलिका दहन करून होळी साजरी करता येईल. पण महाराष्ट्र शासनाने रात्री दहा वाजेपर्यंत होळी साजरी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी सरकारी मार्गदर्शक नियमांचे पालन करून होळी साजरी करावी. नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे.
होळी लावण्याआधी होलिका देवीची पूजा करतात. ज्या ठिकाणी होळी लावणार आहात तिथे आधी शेणाच्या गोवऱ्या मांडाव्या. भोवताली लाकूड फाटा, सुके गवत, सुकी पाने रचून होळीची मांडणी करावी. नंतर होलिका मातेला (होलिका देवी) जलाभिषेक करतात. नंतर रचलेल्या होळीत हळद, कुंकू, फुले आणि अक्षता वाहा. पुन्हा थोडे पाणी अर्पण करा. एक धागा रचलेल्या होळीभोवती सात वेळा गुंडाळा. यानंतर होलिका देवी आणि भगवान नृसिंह यांची आरती करा. आता एका होळी लावा.
राजा हिरण्यकश्यप याने देवाला प्रसन्न करून वर मिळवला. दिवस किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर, मानव किंवा दानव माझ्या मृत्यूचे कारण होणार नाही असा वर राजा हिरण्यकश्यप याने मिळवला होता. हा वर मिळाल्यानंतर राजा स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागला. त्याने प्रजेवर अन्याय करायला सुरुवात केली. हिरण्यकश्यप राजाचा मुलगा प्रल्हाद कायम भगवान विष्णू यांचे नामस्मरण करायचा. त्याला भगवंताचे नाव घेण्यात आनंद वाटायचा आणि प्रल्हादचे वागणे राजाला आवडत नव्हते. देवाला एवढे महत्त्व देणाऱ्या प्रल्हादला शिक्षा देण्यासाठी राजाने एक दिवस स्वतःला बहिणीला होलिकेला बोलावले.
होलिकेला आग न जळण्याचे वरदान मिळाले होते. यामुळे राजाने प्रल्हादला मांडीवर घेऊन पेटत्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद हे पाहून घाबरेल आणि भगवान विष्णू यांचे नाव घेण्याऐवजी आपल्याला हाका मारेल असे राजाला वाटत होते. पण भलतेच घडले.
पेटत्या चितेत होलिकेच्या मांडीवर बसलेला प्रल्हाद भगवान विष्णू यांचे नामस्मरण कर होता. यामुळे चितेवरील आग तीव्र झाली पण त्यातून प्रल्हाद काहीही झाले नाही. होलिका मात्र वाईट विचाराने चितेवर बसली होती यामुळे वरदानाचा लाभ तिला झाला नाही. आगीत होलिका भस्मसात झाली. थोडक्यात वाईटाचा नाश झाला आणि चांगले टिकून राहिले. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन करून होळीचा सण साजरा करतात.