Rabindranath Tagore Birth Anniversary 2022: मुंबई : भारतातले महान साहित्यिक, लेखक, संगीतकार आणि चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती आहे. रवींद्रनाथ टागोरांना आपल्या साहित्यिक कारकीर्दीसाठी आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते. टागोर जरी मूळचे बंगाली असले तरी त्यांचे आणि महाराष्ट्राचे नाते आहे. टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक कविता लिहिली होती. आणि ही कविता पु.ल. देशपांडे यांनी मराठीत अनुवादित केली आहे. वाचा टागोरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली कविता.
हे राजा शिवाजी,
कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी
कडे कपरीतील राणी वनी अंधारात
विधूल्तेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा
विसकटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला
मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन
त्या दिवशी हा वंग देश झोपूनच राहिला.
नाही आला तो धावून बाहेर, नव्हता काही संदेश
नव्हता शुभंकर शंखनाद
बसले होते शांतमुखी ग्रामवासी सारे, निवांत, स्वस्थ
आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती
चेतवलेस अग्निकुंड तू
युगांतच्या क्षितिजावर विद्युत अग्निने
त्या प्रलयकारी समयी थरारला तूरा मोगलांच्या शिरपेचातल्या
एखाद्या पिकल्या पानाप्रमाणं
हे शिवाजी राजा
हे राज तपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना
विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आली आहे.
काळाला त्याचा एक कण देखील नष्ट करता येईल का ?
तुझा प्राण यज्ञ स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातील तुझी साधना
आज भारत देशाचं रण बनली आहे युगानुयुगांसाठी
हे राज्य संन्यासा निर्झर जसा पथर विदीर्ण करून होतो जागा
तसा तू प्रकटलास दीर्घकाळ आज्ञातात राहून
सारं जग झालं विस्मयचकित
सार्याग आकाशाला भरून टाकते ज्यांची पताका
तो हा शिवराया इतका काळ इतका लहानगा होऊन
कुठं बरं झाकून राहिला होता आजवर
मी पूर्व भारतातील कवी काही अपूर्व दृश्य पाहतोय
बंगालच्या अंगणात कशी रे दुमदुमली तुझी नौबत
तीन शतकांची गाढ अंधारातील रात्र दूर सारून
कसा रे तुझा प्रताप उगवला आहे आज पूर्व क्षितिजावर
सत्य मरत नसते कधीच
उपेक्षेने वा अपमानाने, शतकानुशतकं विस्मृतिच्या तळाशी
तळपलं गेलं तरीही
हे राजन आज आम्ही तुला ओळखलं रे ओळखलं
तू तर महाराजा आहेस आठ कोटी वंगपुत्र उभे आहेत आज
तुझे राज कर आपल्या हाती घेण्यासाठी
त्यावेळी नाही रे ऐकले तुझं सांगणं
आता मात्र शिरोधार्य मानू तुझे आदेश
सारा भारत देश आता एक होईल.
तुझ्या ध्यान मंत्रावर
फडकवू आम्ही ध्वजा बनवून वैराग्याची उत्तर्याची
तेच रे आम्हा दरिद्री लोकांचे समर्थ
या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार
या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचे पाथेय
हे वंग वासियांनो म्हणा आज एक स्वरात मराठ्यांसह
शिवाजी महाराजांचा विजय असो
हे वंग वासियांनो चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र
आज एकाच वास्तवानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय
करतील गौरव एका पुण्य नामाचा, एका पुण्य नामाचा
माराठीर साजे आजे हे बंगाली
एक कंठे बोलो,
जयतु शिवाजी.