Effect of Divorce : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात होणाऱ्या घटस्फोटांची (Divorce) संख्या कमालीची वाढली आहे. एकमेकांसोबत कुढत कुढत आणि अनिच्छेने जगण्यापेक्षा वेगळे होण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात आणि मानसिकदृष्ट्या तो निर्णय योग्यही मानला जातो. जबरदस्तीने कुठलंही नातं (Relation) टिकवून ठेवण्यापेक्षा ते संपवणं अधिक योग्य असल्याचं वेळोवेळी सिद्धही झालं आहे. मात्र घटस्फोट घेणाऱ्या ज्या जोडप्यांना मुलं (Children) असतात, त्यांच्या मनावर मात्र याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. आईवडिलांनी घटस्फोट घेताना मुलांच्या मनाची काळजी घेतली नाही आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळलं नाही, तर काही गंभीर मानसिक लक्षणं मुलांमध्ये तयार होतात. जाणून घेऊया, अशीच काही गंभीर लक्षणं
आपल्याला दोनपैकी एकाच कुठल्या तरी पालकासोबत इथून पुढे राहावं लागणार आहे, हे जेव्हा मुलाला समजतं, तेव्हा त्याच्या मानसिकतेवर मोठा आघात होतो. लहान मुलं संवेदनशील असतात आणि हा धक्का ती पचवू शकत नाहीत. आपल्या आईवडिलांनाच मुलं यासाठी जबाबदार ठरवतात आणि उद्धटपणे, आक्रमकपणे वागू लागतात.
ज्या मुलांवर आपल्या आईवडिलांच्या घटस्फोटाचा गंभीर परिणाम होतो, ती मुलं त्यांना टाळायला सुरुवात करतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची कुठलीच गोष्ट गांभिर्याने घेताना दिसत नाहीत.
अधिक वाचा - Relationship Tips: दादल्यांनो हे माहिती आहे का? बायको नेहमी-नेहमी का करते कट-कट
आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मनावर परिणाम झालेली मुलं एकलकोंडी होतात. त्यांना आपल्या मित्रमैत्रिणी, शेजारी किंवा समाजात मिसळायला आवडत नाही. ती घरी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यासारख्या गोष्टीत स्वतःला अडकवून घेतात आणि एकलकोंडी होत जातात.
आईवडिलांच्या घटस्फोटाच्या धक्क्याने मुलं आपल्या छंदांकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा मूडच तयार होत नाही. त्यामुळे ते सतत एक प्रकारच्या मानसिक तणावात राहतात आणि दुःखी बनतात.
अधिक वाचा - 10 Beautiful Places: आयुष्यात एकदा तरी 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या, जिवंतपणी अनुभवता येईल स्वर्गसुख
स्वतःला जखमा करून घेणं, व्यसनाधीन होणे, होमवर्क न करणे, वर्गात लक्ष न देणे यासारख्या कृती मुलं करू लागतात. स्वतःला शिक्षा होईल, अशी कामं ती करायला सुरुवात करतात. ज्या मुलांमध्ये अशी लक्षणं आढळतात, त्यातील बहुतांश मुलांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं किंवा प्रक्रिया सुरु असल्याचं दिसून आलं आहे.
मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणून घटस्फोटच न घेणे, हा काही योग्य उपाय असू शकत नाही, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. मात्र घटस्फोटाची प्रक्रिया राबवत असताना आपल्या मुलांचाही विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. मुलांना या गोष्टीची कल्पना देण्यापूर्वी मानस तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि मुलांच्या मनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना ही बाब सांगणं आवश्यक आहे.