मुंबई: गोवर्धन पूजा ही अन्नकूट उत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राचा पराभव केला होता आणि ही पूजा त्याच उत्सवाप्रीत्यर्थ केली जाते. यावेळी गोवर्धन पूजेचा मुहूर्त दुपारी ३ वाजून १८ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल. गोवर्धन पूजा कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच दीपावलीच्या दुसर्या दिवशी होते.
ही पूजा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतर द्वापर युगापासून सुरू झाली. हा उत्सव ब्रजवासीयांचा मुख्य सण मानला जातो. या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ परमेश्वराला अर्पण केले जातात.
गोवर्धन पूजनाच्या दिवशी बळी पूजा, मार्गपाळी इत्यादी सणही साजरे केले जातात. तसेच या दिवशी गाय, बैल आणि इतर जनावरांना अंघोळ घालून धूप, चंदन व फुलांचा हार घातला जातो. गोमातेला मिठाई भरवल्यानंतर तिची पूजा केली जाते आणि नंतर श्रीकृष्णाची पूजा केली जाते.
शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती बनवली जाते. श्रीकृष्णासमोर एक गाय, तांदूळ, फुले, पाणी, दही आणि तेलाचे दीप प्रज्वलित केले जातात आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि नंतर कृष्णाला प्रदक्षिणा घातली जाते.
श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी सलग सात दिवस गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून धरले होते, सुदर्शन चक्राच्या प्रभावामुळे ब्रजवासीयांवर पाण्याचा एकही थेंब पडला नाही. तेव्हा ब्रह्माजींनी इंद्रांना सांगितले की पृथ्वीवर कृष्णाचा जन्म झाला आहे आणि त्याच्याशी वैर धरणे योग्य नाही. श्रीकृष्णाचा अवतार जाणून घेतल्यावर इंद्रदेव यांना त्यांच्या कार्याची लाज वाटली आणि त्यांनी श्रीकृष्णाची माफी मागितली. सातव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खाली ठेवला तेव्हा ग्रामस्थांनी आनंदाने व सन्मानार्थ अन्नकूट साजरे केले. मग त्यांनी भगवंतासाठी भोग आणि नैवेद्य केले आणि 'छप्पन भोग' लावून त्यांना भोजन दिले.
अन्नकूट उत्सव साजरे केल्यास माणूस दीर्घ आयुष्य व आरोग्य मिळवतो आणि दारिद्र्याचा नाश होऊन माणूस आयुष्यभर सुखी आणि समृद्ध राहतो. असे मानले जाते की या उत्सवाच्या दिवशी जो दुःखी राहतो तो आयुष्यभर दुःखी राहतो. म्हणून श्रीकृष्णाला प्रिय असणारा अन्नाकूट उत्सव हा अत्यंत प्रेमाने आणि आनंदात साजरा करावा.