Bhagwat Ekadashi 2023 : भागवत एकादशी म्हणजे काय? कधी आहे भागवत एकादशी? जाणून घ्या भागवत एकादशीचा पूजाविधी आणि व्रतविधी

Bhagwat Ekadashi Vrat Katha 2023 Marathi : प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करतात. विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. यंदा शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी भागवत एकादशी आहे. 

Details about Bhagwat Ekadashi 2023 read in Marathi
भागवत एकादशी म्हणजे काय? कधी आहे भागवत एकादशी?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भागवत एकादशी म्हणजे काय? कधी आहे भागवत एकादशी?
  • एकादशीचे महत्त्व
  • स्मार्त आणि भागवत एकादशी यांतील भेद

Bhagwat Ekadashi  Vrat Katha 2023 in Marathi : प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास करतात. विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. यंदा शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 रोजी भागवत एकादशी आहे. 

स्मार्त आणि भागवत एकादशी, असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ एक याप्रमाणे दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. पण भागवत एकादशीला नाव नसते. 

वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतो. विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशी साजरी करू शकतात. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असे सांगतात. 

February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

भागवत एकादशीचे व्रत

  1. सकाळी नित्यकर्म आटोपून घ्या. आंघोळ करा. यानंतर व्रतासाठी तयारी सुरू करा. भगवान विष्णू यांचे नामस्मरण करा.
  2. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनापासून पूजा करा.
  3. विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
  4. मांसाहार टाळा. धूम्रपान टाळा. मद्यपान टाळा. खोटे बोलू नका. फसवणूक करू नका. 
  5. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांचे दान करा.

भागवत एकादशी : पूजाविधी

भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करुन धूतवस्त्र परिधान करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा. चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो यांची प्रतिष्ठापना करा. विष्णू देवाची फळे, फुले, नारळ, पान सुपारी, लवंग यांनी पूजा करा. पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा. विष्णू देवाला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या. 

भागवत एकादशी : व्रताचा समारोप

भागवत एकादशीचे व्रत ज्या दिवशी कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठून नित्यकर्म आटोपून घ्यावी. आंघोळ करावी. धूतवस्त्र परिधान करावे. ब्राह्मणांना आणि गरजूंना यथाशक्ती दान करावे. दानधर्म करुन भागवत एकादशीच्या व्रताचा समारोप करावा.

एकादशी म्हणजे काय?

एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.

एकादशीचे महत्त्व

प्रत्येक मासात (महिन्यात) 2 प्रमाणे वर्षाला 24 एकादशी असतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो. कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.

स्मार्त आणि भागवत एकादशी यांतील भेद

वारकरी संप्रदाय मुळातच वैष्णव संप्रदायाचा आहे. वारकरी विठ्ठलाला म्हणजेच श्रीकृष्णाला त्यांचा गुरु मानतात. यामुळे गुरु परंपरा, नामसंकीर्तन, सगुण भक्तीतून निर्गुणाकडे वाटचाल करणारे अशी भागवतात मांडलेली तत्वे जशीच्या तशी वारकरी  मानतात म्हणून ते भागवत धर्म (कर्तव्य) पाळतात. याच कारणामुळे वारकरी भागवत धर्म आणि भागवत एकादशीचे व्रत करतात.

हिंदू धर्म ग्रंथ साहित्य अगदी अनादी कालापासून आतापर्यंत आपल्याकडे आले ते दोन स्वरूपात. एक श्रुती म्हणजे एक गुरूकडून आपल्या शिष्याकडे तोंडी पाठांतर करून वेद, उपनिषद वगैरे आणि दुसरे ऋषी मुनींनी त्यांच्या स्मृती लिहून ठेवल्या ते साहित्य. अठरा पुराणे वगैरे. तर अशा स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात.

एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्तआणि भागवत अश्या दोन्हीही एकादशी दोन वेगळ्या म्हणजेच एका मागोमाग दिवशी येतात.

आपण सूर्योदयाला असणारी तिथी मानतो. त्याप्रमाणे...

  1. जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो, आणि सूर्योदयानंतर दशमी संपली तर त्यादिवशी एकादशीचा क्षय असतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे समजतात.
  2. जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
  3. द्वादशी जर दोन दिवसात असतील तर पहिली द्वादशी म्हणजे भागवत एकादशी आणि त्याआधीची तिथी म्हणजे स्मार्त एकादशी.
  4. वरील अपवाद वगळता जर एकादशी एकाच दिवशी आल्यास वारकऱ्यांसह सर्व विष्णू भक्त या व्रताचे पालन करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी