देवघर: देवघर: रविवारी झारखंडमधील (Jharkhand) देवघर (Deoghar) येथील त्रिकूट टेकड्यांवर रोपवेच्या (Ropeway) ट्रॉली एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला. कालच्या अपघातानंतरही सोमवारी दुपारपर्यंत 12 केबिनमध्ये किमान 48 जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, डीसींनी दोन जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे दिसते, ज्यामुळे केबल कारची टक्कर झाली.
या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. सकाळपासूनच हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी पोहोचले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अपघातानंतर रोपवे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या घटनेनंतर केबल कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पती-पत्नी गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. ते म्हणाले की, स्थानिक लोकही एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत. अफवा पसरवू नका असे आवाहन लोकांना करताना उपायुक्त म्हणाले, "परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रोपवेवर केबल कारमध्ये अजूनही काही लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे.
तर दुसरीकडे देवघर येथील त्रिकूट रोपवे दुर्घटनेवर खासदार निशिकांत दुबे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्रिकूट रोपवे दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. एनडीआरएफ टीम व्यतिरिक्त, लष्कराचे जवानही रविवारपासून देवघरच्या त्रिकूट रोपवेवर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पोहोचले आहेत. हेलिकॉप्टरने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.