Modi Govt: नवी दिल्ली: महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय बंडानंतर नवं सरकार अस्तित्वात आलं. ज्या सरकारचं नेतृत्व हे भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) सोपावलं. ज्यामुळे शिवसेनेतून (Shiv Sena) फुटून आलेल्या शिंदे गटाला (Shinde Group) एक मोठी राजकीय ताकद मिळाली. असं असताना दुसरीकडे शिवसेनेच्या १२ खासदारांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सामील झाला. आता याच १२ खासदारांपैकी दोन खासदारांना थेट केंद्रीय मंत्रिपदाची (Union Cabinet Minister) लॉटरी लागण्याची शक्यता आहे. (according to sources will be a reshuffle in union cabinet shinde group will get two ministerial posts)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने काही पक्षांतर्गत बदल करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. हा फेरबदल देखील लवकरच केला जाणार असल्याची जोरदार चर्चा ही राजधानी दिल्लीत सुरु आहे.
जर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर यावेळी शिंदे गटाला दोन मंत्रिपदं दिली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात शिंदे गटामुळेच भाजप पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकलं. त्यामुळे याचीच परिणिती म्हणून शिंदे गटात आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर खासदारांना मंत्रिपद भाजपकडून दिलं जाऊ शकतं.
दरम्यान, मोदी सरकार जेव्हा-जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा-तेव्हा युतीमध्ये असलेल्या शिवसेनेला भाजपने फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देऊ केलं होतं. २०१४ साली पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला अवजड उद्योग खातं देण्यात आले होतं. तर २०१९ साली देखील हेच खातं देण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युती तुटल्याने अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हा सगळा इतिहास लक्षात घेता भाजप शिंदे गटाला खरोखरच दोन कॅबिनेट मंत्रिपदं देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काही मंत्र्यांना मिळणार डच्चू
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे पुन्हा एकदा आपल्या पक्षातील केंद्रीय मंत्र्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं आहे. कारण मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय झाल्यास गेल्या तीन वर्षात ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक झालेली नाही त्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. यासाठी आता स्वत: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे प्रत्येक मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करत असून त्याच आधारे त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवायचं की नाही याचा विचार करतील.