कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात दलू शेख या ५० वर्षीय भाजप कार्यकर्त्याच्या घरावर हल्लेखोरांनी गावठी बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी दलू शेख याची हत्या केली. लाभपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'शनिवारी रात्रीच्या सुमारास गावठी बॉम्बच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दलू शेख (५० वर्षे) याचा मृत्यू झाला'.
पोलिसांनी सांगितले की, 'मृतक व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता होता. अधिक तपास सुरू आहे आणि तपासानंतरह त्याच्या मृत्युचं नेमकं कारण समोर येईल. अद्याप या घटनेची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये'. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, दलू शेख याची हत्या तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी केली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही खूप वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असा आरोपही स्थानिकांनी केली आहे.
प्रदेश भाजपचे महासचिव सायंतन बसू यांनी म्हटलं की, तृणमूल काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच टार्गेट केलं जात आहे. असं चालणार नाही आणि आरोपींना सोडून देता कामा नये. हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये की पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारे भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीही भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.
याच वर्षी जून महिन्यात पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथे भारतीय जनता पार्टी (भाजप)च्या युवा शाखेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर हिंसेच्या घटना होतच आहेत. भाजपने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षावर हिंसाचाराचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने दावा केला होता की, आणखीन एका पक्षाच्या कार्यकर्त्या सरस्वती दास यांची हत्या करण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील बशीरहाट येथे सरस्वती दास यांची हत्या करण्यात आली असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात २४ वर्षीय भाजप कार्यकर्ता कृष्णा देबनाथ याची हत्या करण्यात आली होती. नादिया जिल्ह्यातील नबाद्वीप येथील स्वरूपनगर परिसरात कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कृष्णा याच्या हत्येनंतर संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी नबाद्वीप येथे रास्ता रोको करत कृष्णा याचा मृतदेह रस्त्यावर ठेवला होता. कृष्णा याच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते करत होते.
या घटनेनंतर बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करत म्हटलं की, 'एक तरुण ज्याचं नाव कृष्णा देबनाथ होतं त्याची तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हत्या केली कारण तो जय श्रीराम च्या घोषणा देत होता. ममता बॅनर्जी यांच्या खूनी राजकारणाचा लवकरच अंत होईल'.