inflation news updates: संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राज्यसभेमध्ये आज महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी उत्तरप्रदेशातील भाजपचे सदस्य डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांनी महागाईच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर करत विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात देशातील महागाई दराची संपूर्ण माहिती राधामोहन दास अग्रवाल यांनी मांडली. इतकेच नाही तर भाजपशासित राज्यांमध्ये महागाईचा दर कमी आहे आणि काँग्रेसशासित राज्यांत महागाई दर जास्त का आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (bjp rule states have less Inflation rates compare to other states claimed by member of parliament)
महागाई रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आज भारताचा विकास दर संपूर्ण जगात सर्वाधिक आहे आणि संपूर्ण जग भारताच्या मॉडेलचा अभ्यास करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अग्रवाल यांनी पुढे म्हटलं, स्वातंत्र्यनंतरच्या ७५ वर्षांपैकी सुरुवातीची २७ वर्षे देशात काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा महागाई दर १३ ते २८ टक्क्यांपर्यंत होता. त्यानंतर मधल्या काळात जनता पक्षाचं सरकार आलं. या काळात महागाई दर २.५२ टक्के इतका होता. मग पुन्हा १५ वर्षे काँग्रेसची सत्ता आली आणि या काळात महागाई दर १० टक्क्यांहून ११.३५ टक्क्यांवर पोहोचला होता.
अटलजींचे सरकार आल्यावर त्यांनी महागाई नियंत्रणात ठेवली. त्यांच्या सरकारच्या काळात १९९९ मध्ये महागाई दर ४.६७ टक्के, २००० मध्ये ४.०१ टक्के, २००१ मध्ये ३.७५ टक्के, २००२ मध्ये ४.३ टक्के आणि २००४ मध्ये ३.७७ टक्के महागाई होती. काँग्रेसचे सरकार असताना २००९ मध्ये महागाई १०.८८ टक्क्यांवर पोहोचली होती. २०१० मध्ये हा दर ११.९९ टक्क्यांवर पोहोचला. २०११ मध्ये ८.९ टक्के, २०१२ मध्ये ९.४८ टक्के आणि २०१३ मध्ये हा दर १०.४२ टक्क्यांवर पोहोचला.
नरेंद्र मोदी २०१४ मध्ये देशाचे पंतप्ऱधान झाले आणि त्यांनी महागाई नियंत्रणात आणली. २०१४ मध्ये ६.७७ टक्के, २०१५ मध्ये ४.९१ टक्के, २०१६ मध्ये ४.९५ टक्के, २०१७ मध्ये ३.३ टक्के, २०१८ मध्ये ३.९४ टक्के, २०१९ मध्ये ३.७५ टक्के आणि २०२१ मध्ये हा दर ५ टक्क्यांवर असल्याचंही अग्रवाल म्हणाले.
अधिक वाचा : Har Ghar Tiranga Abhiyan : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का बदलले त्यांचे DP?
अग्रवाल यांनी पुढे दावा केला आहे की, भाजपशासित राज्यांमध्ये महागाई कमी आहे तर बिगर भाजपशासित राज्यांमध्ये महागाई खूप आहे. भाजपशासित उत्तरप्रदेशात महागाई ६.७ टक्के इतका आहे तर देशाची सरासरी ७.१ टक्के आहे. उत्तराखंडमध्ये महागाईचा दर ६.०५ टक्के आहे. मध्यप्रदेशात थोडे अधिक आहे. तेथे महागाई दर ७.१६ टक्के आहे. बिहारमध्ये भाजपचं सरकार असून तेथे महागाई दर ५.९७ टक्के इतका आहे.
अग्रवाल यांनी म्हटलं, बिगर भाजपशासित राज्यांत महागाई जास्त आहे. तेलंगणात १०.०५ टक्के, पुद्दुचेरीत १०.०९ टक्के, राजस्थान १०.७९ टक्के, ओडिशात ७.७१ टक्के, आंध्रप्रदेशात ८.६३ टक्के, लक्षद्विपमध्ये ९.६ टक्के आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्यापूर्वी ८.५२ टक्के इतका दर होता.