Captain Vikram Batra India Remembering Hero Of The Kargil War On 7 July Martyrdom Day : पाकिस्तानने भारताच्या कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. श्रीनगर हाय वे ताब्यात घेऊन काश्मीर भारतापासून तोडण्याचे स्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या वीरांनी पिटाळून लावले होते. कारगिलची लढाई १९९९ मध्ये झाली. या लढाईत आजच्या दिवशी म्हणजेच ७ जुलै १९९९च्या दिवशी कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीराचे वय होते फक्त २४ वर्षे.
कॅप्टन विक्रम बत्रा तेराव्या जम्मू काश्मीर रायफल्स या इन्फ्रंट्री रेजिमेंटचा अधिकारी होता. कारगिलमध्ये उंचावर हवा अतिशय विरळ असते. श्वास घेण्यास त्रास होतो. या वातावरणात लढण्यासाठी आधी कारगिलच्या पायथ्याशी किमान एक-दोन आठवडे थांबून वातावरणासोबत जुळवून घ्यावे लागते. या प्रतिकूल वातावरणात जगण्याची सवय असल्यामुळे जम्मू काश्मीर रायफल्सकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कॅप्टन बत्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पॉइंट ५१४० हे शिखर जिंकले होते. पॉइंट ५१४० भारताच्या ताब्यात आल्यानंतर तिथे ताज्या दमाच्या नव्या जवानांची नियुक्ती करण्यात आली. हाय वे जवळ असलेले पॉइंट ४८७५ हे शिखर जिंकून घेण्यासाठी कॅप्टन बत्रा आणि त्याच्या टीमची नियुक्ती झाली. हे शिखर जिंकणे भारतासाठी रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या शिखरावरून थेट हाय वे वर गोळीबार करणे आणि तोफांचा मारा करणे पाकिस्तानसाठी सोपे झाले होते. यामुळेच भारतीय सैन्य शक्य तितक्या लवकर पॉइंट ४८७५ जिंकून घेऊ इच्छीत होते. पॉइंट ४८७५ वर मोठी लढाई अपेक्षित होती. यादृष्टीने तयारी करून भारतीय सैनिक मोहिमेवर रवाना झाले. शिखराच्या माथ्यावर मोठा संघर्ष झाला. पाकिस्तानची एक स्वयंचलित मशीनगन भारतीय सैनिकांच्या मार्गात मोठा अडथळा झाली होती. अखेर ही मशीनगन ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणावर थेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्या दरम्यान भारताचा एक सैनिक जखमी झाला. या जखमी सैनिकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेता यावे म्हणून कॅप्टन विक्रम बत्रा मशीनगनच्या एकदम समोर आले. मशीनगनचा सगळा मारा त्यांनी स्वतःवर झेलला आणि अखेर मशीनगनद्वारे सुरू असलेली भारतविरोधी कारवाई थांबविली. या दरम्यान पाकिस्तानच्या सैनिकांनी झाडलेली एक गोळी कॅप्टन बत्रा यांच्या डोक्यात घुसली. याच गोळीने वेध घेतला आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. पण अखेरचा श्वास घेण्याआधी कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भारतीय सैन्याचे काम सोपे केले होते. भारतीय सैन्याने पॉइंट ४८७५ जिंकून हाय वे च्या संरक्षणासाठी भक्कम मोर्चेबांधणी सुरू केली. यानंतर भारताच्या कारवाईची तीव्रता वाढली आणि पाकिस्तानला कारगिलमध्ये पराभव दिसू लागला. कॅप्टन विक्रम बत्रा यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परवीर चक्र देण्यात आले. त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला.
1. शिक्षकाच्य घरात जन्म : पालमपूरचे निवासी शिक्षक जी.एल. बत्रा आणि त्यांची पत्नी कमलकांता बत्रा यांच्या घरात ९ सप्टेंबर १९७४ रोजी दोन मुलींनंतर दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. कमलकांता यांची 'श्रीरामचरितमानस'वर श्रद्धा होती म्हणून त्या मुलांना लव आणि कुश म्हणायच्या. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल.
2. सैनिकी शिक्षण : विक्रम बत्रा यांनी सैनिकी शिक्षणासाठी १९९६ मध्ये अलाहाबाद येथून सीडीएस परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अव्वल ३५ जणांमध्ये विक्रम बत्रा यांचा समावेश होता.
3. सोपोरमध्य नियुक्ती : डिसेंबर १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रम बत्रा यांची नियुक्ती ६ डिसेंबर १९९७ रोजी जम्मूतील तेराव्या जम्मू काश्मीर रायफल्समध्ये लेफ्टनंट पदावर झाली. १९९८ मध्ये त्यांना पाच महिन्यांचा यंग ऑफिसर्स कोर्स करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये पाठविण्यात आले. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांचा अल्फा ग्रेडिंगने गौरव करण्यात आला. विक्रम बत्रा यांनी १९९९ मध्ये कमांडो ट्रेनिंग पूर्ण केले तसेच इतर वेगवेगळी सैनिकांसाठी आवश्यक कौशल्यं आत्मसात केली.
4. घरी नक्की येणार : मार्च १९९९ मध्ये होळीसाठी सुटीवर आलेले विक्रम बत्रा त्यांची होणारी पत्नी डिंपल चीमा हिच्याशी गप्पा मारत होते. गप्पा मारताना बत्रा म्हणाले काहीही झाले तरी मी घरी नक्की येणार. तिरंगा फडकावून येणार किंवा तिरंग्यात लपेटून येणार पण घरी नक्की येणार.
5. वीरमरण : पॉइंट ४८७५ साठी शिखर माथ्यावर झालेल्या लढाईत कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले.
6. ये दिल मांगे मोअर : जून १९९९ मध्ये कारगिलच्या लढाईत विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वात त्यांच्या सहकाऱ्यांनी हम्प आणि रॉकी नॉब जिंकून घेतले. या कामगिरीनंतर विक्रम बत्रा यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वात त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीनगर-लेह हाय वे जवळचे पॉइंट ५१४० हे शिखर जिंकले. यानंतर हाय वे जवळचे पॉइंट ४८७५ शिखर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या नेतृत्वात सैनिक रवाना झाले. याच मोहिमेत ७ जुलै १९९९ रोजी कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. याआधी पॉइंट ५१४० जिंकल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांना वरिष्ठांना रेडिओ संदेश पाठवाताना 'ये दिल मांगे मोअर' अर्थात आणखी कठीण मोहीम द्या ती पण यशस्वी करू असे विश्वासाने सांगितले होते. हाच तो संदेश जो मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचला आणि पराक्रमी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा संपूर्ण देशाने गौरव केला.
7. कारगिलचा शेरशहा : भारत सरकारने कॅप्टन विक्रम बत्रा यांचा त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परवीर चक्र देऊन गौरव केला. याआधी पॉइंट ५१४०साठीच्या लढाईकरिता कॅप्टन विक्रम बत्रा यांना वरिष्ठांनी शेरशाह हा कोड दिला होता. रेडिओवरून वरिष्ठांशी सांकेतिक भाषेत संवाद साधताना कॅप्टन विक्रम बत्रा स्वतःची ओळख शेरशाह अशीच देतील हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. या इतिहासाला सिनेमाच्या माध्यमातून साकारताना सिनेमाचे नाव शेरशाह असे करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला. आजही कारगिलचा शेर म्हणून कॅप्टन विक्रम बत्रा अर्थात शेरशाह यांचा गौरवाने उल्लेख होतो.