China's PLA returns Miram Taron to india : नवी दिल्ली : भारतातील अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या १७ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतल्याची कबुली चिनी सैन्याने दिली. हा तरुण १८ जानेवारी २०२२ पासून बेपत्ता होता. अखेर या तरुणाला चिनी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
भारत सरकारने अप्पर सियांग जिल्ह्यातील १७ वर्षांच्या मिराम तारोन (Miram Taron) याची तपासणी सुरू असल्याची माहिती दिली. नियमानुसार वैद्यकीय तपासणीत मिराम सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेतली जाईल. यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मिरामला घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
याआधी मिराम बेपत्ता झाल्यावर भारताने हॉटलाइनद्वारे चिनी सैन्याशी संपर्क साधला. सुरुवातीला मिरामविषयी माहिती न देणाऱ्या चीनने काही दिवसांनी त्याला ताब्यात घेतल्याची कबुली दिली.
मिरामचा मित्र जॉनी येइंग याने दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्याच्या पथकाने मिरामचे अपहरण केले होते. पण भारताने तातडीने हालचाली केल्यानंतर चिनी सैन्याने मिरामचा ताबा भारताच्या सैन्याला दिला.
खासदार तापीर गाओ यांनी मिरामला सुरक्षित घरी आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती. केंद्र सरकारने मिराम प्रकरणात ठोस माहिती आधारे वेगाने हालचाली सुरू केल्या. यानंतर चिनी सैन्याने मिरामला ताब्यात घेतल्याचे सांगितले. प्रजासत्ताक दिनी भारताने मिरामसाठी पुन्हा एकदा चिनी सैन्याशी हॉटलाइनवरुन संपर्क साधला. यावेळी मिरामचा ताबा कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याला दिली जाईल याची माहिती चिनी सैन्याने दिली. भारताने दबाव कायम ठेवला. अखेर चिनी सैन्याने मिरामला भारतीय सैन्याकडे सोपवले.