Hanuman Chalisa: देशभरात हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यात तुलसी पीठाधीश्वर जगदगुरू रामभद्राचार्य (Rambhadracharya) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) चुकीच्या पद्धतीनं पठण केलं जात असल्याचं रामभद्राचार्य यांनी म्हटलं आहे. हनुमान चालिसामधील काही पंक्ती चुकीच्या पद्धतीनं उच्चारल्या जातात असं देखील रामभद्राचार्य यांनी म्हटलं आहे. त्यात सुधारणा गरजेची आहे. हनुमान चालिसामधी काही शब्द चुकीचे प्रकाशित झाल्यापुळे भाविक देखील ते चुकीच्या पद्धतीनेच उच्चारतात, असे देखील रामभद्राचार्य यांनी सांगितले.
पद्मविभूषण आणि कथावाचक रामभद्राचार्य आग्रा येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी हनुमान चालिसामध्ये चार चुका असल्याचे सांगितले. या चुका लवकर दुरुस्त होणं गरजेचं असल्याची अपेक्षा देखील रामभद्राचार्य यांनी व्यक्त केली आहे.
हनुमान चालिसामध्ये एका पंक्तित 'शंकर सुमन केसरी नंदन...' असं म्हटलं आहे. त्यावर रामभद्राचार्य म्हणाले, हनुमान यांना शिव शंकराचा पुत्र असे संबोधलं आहे. मात्र, ते चुकीचं आहे. कारण हनुमान हा शिव शंकराचाच अवतार आहे. त्यामुळे हनुमान चालिसामध्ये 'शंकर स्वयं केसरी नंदन', असा उच्चार करायला हवा.
तसेच हनुमान चालिसाच्या 27 व्या पंक्तित म्हटलं आहे, की 'सब पर राम तपस्वी राजा', परंतु ते चुकीचं छापून आलं आहे. रामभद्राचार्य म्हणजे तपस्वी राजा नव्हे, त्या ऐवजी 'सब पर राम राज फिर ताजा' असा उच्चार अपेक्षीत आहे. हनुमान चालिसाच्या 32 व्या पंक्तित 'राम रसायन तुम्हारे पास आ सदा रहो रघुवर के दासा...' असं आहे. परंतु 'सादर रहो रघुपति के दासा', असा उच्चार व्हायला हवा. त्याचबरोबर हनुमान चालिसाच्या 38 व्या पंक्तित 'जो सत बार पाठ कर कोई...' असं लिहिलं आहे. त्या ऐवजी 'यह सत बार पाठ कर जोही...', असा उच्चार करायला हवा, असं रामभद्राचार्य यांनी सांगितलं आहे.
जगदगुरु रामभद्राचार्य यांनी रामचरितमानसला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, सन 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल. त्यावेळी मोदी सरकारकडे रामचरितमानसला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम्ही संत मंडळी करणार आहोत. याबाबत संसदेत प्रस्ताव दाखल करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल, असं देखील रामभद्राचार्य यांनी सांगिलतं आहे.
रामभद्राचार्य हे आणखी एका मुद्द्यावरून सध्या चर्चेत आहेत. 'कोठी मीना बाजार'च्या नामांतराची मागणी रामभद्राचार्य यांनी केली आहे. 'कोठी मीना बाजार'चं नाव 'सीता बाजार' असं करण्यात यावं अशी मागणी रामभद्राचार्य यांनी केली आहे.
कोण आहेत रामभद्राचार्य?
रामभद्राचार्य यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या बहुचर्चित खटल्यात साक्ष दिली होती. रामभद्राचार्य यांनी रामलल्लाच्या बाजुने सुप्रीम कोर्टात वेद पुराणाचा दाखला दिला होता. त्यांनी ऋग्वेदमधील जैमिनीय संहितेचं उदाहरण कोर्टात दिलं होतं. तत्कालीन सरयू नदीचा उगम आणि तिचा प्रवाहाच्या दिशेबाबत अचूक माहिती कोर्टात सादर केली होती.