नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र (Indian independence) लढ्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत. ज्या आपल्या लक्षात नेहमी राहतात. मग ते भगतसिंग (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru), सुकदेव (Sukdev) आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान किंवा मीठाचा सत्याग्रह ह्या घटना आपल्या मनात कोरल्या गेल्या आहेत. भारताच्या इतिहासाच्या पानात सगळ्यात अधिक ठळक दिसतं ते म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडची (Jaliyanwala Bag Massacre) घटना. परंतु मित्रांनो या हत्याकांडाआधी ब्रिटिशांनी अजून एक नरसंहार केला होता. हा नरसंहार जालियन बागाप्रमाणेच काळजाचा थरकाप उडवणारा आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ६१ वर्षांपूर्वी पंजाबमधील अजनाला (Ajnala Punjab) गावात नरसंहार झाला होता.
या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले आणि विहिरीत फेकलेले २८२ लोक गंगेच्या काठावरील उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमधील होते. बीएचयूसह पंजाब आणि सीसीएमबी (हैदराबाद) च्या शास्त्रज्ञांनी अजनाळ्याच्या जुन्या विहिरीतील अवशेषांचे डीएनए चाचणी आणि आयसोटोप अॅनालिसिसनंतर ही माहिती दिली आहे. प्रतिष्ठित फ्रंटियर्स इन जेनेटिक्स जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
पंजाबमधील अजनाला शहरातील एका विहिरीत (कालियनवाला खोह) मानवी सांगाड्याचे अवशेष 2014 मध्ये सापडले होते. हे सांगाडे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत मारल्या गेलेल्या लोकांचे होते, असे इतिहासकारांचे मत आहे, तर अनेक पुस्तकांमध्ये ठार झालेल्या कृष्णवर्णीय सैनिकांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड केल्याचा उल्लेख आहे. वास्तविकता जाणून घेण्यासाठी पंजाब विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जे. एस. सेहरावत, बीएचयूचे जीन सायंटिस्ट प्रा. ज्ञानेश्वर चौबे, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट, लखनौचे डॉ. नीरज राय आणि CCMB च्या शास्त्रज्ञांनी अवशेषांचा DNA आणि आयसोटोपचा अभ्यास केला. आठ वर्षे चाललेल्या या अभ्यासात हाडे, कवटी आणि दातांच्या डीएनए चाचण्यांमुळे मृत्यू झालेले सर्व उत्तर भारतीय वंशाचे असल्याची पुष्टी झाली आहे. १८५७ च्या क्रांतीपूर्वी त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारले होते, असं यामधून समोर आले आहे.
संशोधन पथकाचे वरिष्ठ सदस्य जगमेंद्र सिंग सेहरावत म्हणतात की, या संशोधनात डीएनएचे ५० नमुने आणि आयसोटोपे अॅनालिसिसचे ८५ नमुने वापरण्यात आले. यामधून लोकांचा अनुवांशिक संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विहिरीमध्ये सापडलेले मानवी सांगाडे हे पंजाब किंवा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांचे नसून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकांसोबत डीएनए जुळत असल्याचे लक्षात आले आहे.