Jammu Kashmir: Armed forces neutralised nearly all terrorists involved in civilian killings during last months श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये सामान्यांच्या हत्या करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा पथके यशस्वी झाली. यासाठी सुरक्षा पथकांनी छोट्या तुकड्या तयार केल्या. स्थानिक पातळीवर गुप्तचरांचे जाळे आणखी सक्षम केले. दहशतवाद्यांच्या मदतनीसांना अटक करुन त्यांची कोंडी केली. छोट्या सर्जिकल ऑपरेशन्सवर भर दिला. या प्रयत्नांमुळे सुरक्षा पथकांना दहशतवाद्यांचे डाव उधळणे शक्य झाले.
नागरिकांमध्ये दहशत बसवण्यासाठी दहशतवाद्यांनी सामान्यांच्या हत्या करण्याचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली होती. पण सुरक्षा पथकांच्या मोहिमांमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पाकिस्तानच्या प्रचार तंत्राला बळी पडणारे आता भारताच्या सुरक्षा पथकांना ठाम पाठिंबा देत आहेत.
दहशतवादी कारवाया थंडावल्या तरच केंद्र सरकारच्या विकास योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळू शकेल, याची जाणीव नागरिकांना झाली आहे. यामुळे सुरक्षा पथकांना आणि सरकारी यंत्रणेला मिळणाऱ्या नागरी पाठिंब्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
श्रीनगरमधील सफा कदल येथे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन शिक्षकांची हत्या झाली. या हत्यांचा आरोपी मेहरान यासीन शल्ला याला सुरक्षा पथकांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी ठार केले. अनंतनागच्या लिटार बस डेपोजवळ सहारनपुरच्या सगीर अहमद अन्सारी यांची हत्या झाली. या हत्येचा आरोपी आदिल आह वानी याला सुरक्षा पथकांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी शिरमल शोपियां येथे ठार केले. कुलगामच्या वानपोह येथे १७ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन बिहार निवासी मजुरांची हत्या झाली. एक मजूर जखमी झाला. या दहशतवादी कारवाईचा आरोपी गुलजार अहमद रेशी याला सुरक्षा पथकांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी ठार केले.