Arpita Mukharjee : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे आता राज्य सरकारपर्यंत जाऊन पोहोचू लागल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. या छाप्यात त्यांना 20 कोटी रुपयांची कॅश सापडली आहे. पार्थ चटर्जी यांच्या घरावरदेखील ईडीकडून छापेमारी सुरू आहे. हे प्रकऱण समोर आल्यानंतर अर्पिता मुखर्जी कोण आहेत आणि पार्थ चॅटर्जी यांच्याशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
अर्पिता मुखर्जी यांनी करिअरच्या सुरुवातीला बंगाली सिनेसृष्टीत काम केलं. काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. मात्र त्यांचं चित्रपटातील करिअर फार मोठं होऊ शकलं नाही. काही सिनेमांमध्ये साईड रोल करण्यापर्यंतच त्या मजल मारू शकल्या. ओडिया आणि तमीळ सिनेमांतही त्यांनी काही भूमिका केल्या.
पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे नेते आणि ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी हे एक दुर्गापूजा मंडळ चालवतात. त्यांच्या मंडळाकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटात दूर्गापूजा सोहळ्याचं आयोजन कऱण्यात येतं. कोलकात्यातील नामांकित दूर्गापूजा मंडळांपैकी हे मंडळ आहे. 2019 आणि 2020 अशी दोन वर्षं अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जींच्या दूर्गापूजा सोहळ्याचा चेहरा बनल्या होत्या. विविध पोस्टरवर त्यांचा फोटो झळकला होता आणि त्या माध्यमातून चटर्जी यांच्याशी त्यांची ओळख झाली. चटर्जी हे या मंडळाचे अध्यक्ष होते आणि मुखर्जी या मंडळाच्या एक प्रकारे ब्रँड अम्बेसेडर म्हणून कार्यरत होत्या.
अर्पिता मुखर्जी यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या छाप्यात 20 कोटी कॅश आढळून आल्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबालो केला आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी एक फोटो सोशल मीडियावर रिलिज केला आहे. या फोटोत एका दूर्गापूजा समारंभात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पार्थ चटर्जी आणि त्यांच्या शेजारी अर्पिता मुखर्जी बसल्याचं दिसतं. या घोटाळ्याचा संबंध कसा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीदेखील आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे.
अधिक वाचा - Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट
तृणमूल काँग्रेसनं या घोटाळ्याबाबत हात वर केले आहेत. ज्यांच्या घरावर ईडीची धाड पडली आणि पैसै सापडले, त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी याचं उत्तर द्यावं, अशी भूमिका टीएमसीने घेतली आहे. या प्रकऱणाशी पक्षाचा काहीही संबंध नसून घडणाऱ्या घडामोडींवर पक्ष लक्ष ठेऊन असल्याचं पत्रक जाहीर कऱण्यात आलं आहे. मुखर्जी यांच्या घरावर पडलेली धाड आणि त्यानंतर सुरू झालेली आरोपांची राजकीय धुळवड सध्या बंगालमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.