Eknath Shinde vs Thackeray: एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. तर कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत तुम्ही सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका. त्यानंतर ही सुनावणी सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी होईल अशी शक्यता होती. मात्र, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. (Maharashtra political crisis hearing on eknath shinde group vs shiv sena may postponed read in marathi)
सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सुनावणीची पुढची संभाव्य तारीख ही १२ ऑगस्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर संभाव्य तारीख ही ८ ऑगस्ट नाही तर १२ ऑगस्ट दाखवण्यात येत आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे त्यांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे. त्यातच आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही सुनावणी लांबणीवर गेल्याने आता या प्रकरणात आता खंडपीठ हेच राहतं का? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
अधिक वाचा : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख करत मानले मतदारांचे आभार
१२ ऑगस्ट रोजी शुक्रवार आहे आणि त्यानंतर काही सुट्ट्या देखील आहेत. १५ ऑगस्ट सुद्धा आहे. त्यामुळे रमण्णा यांच्यासाठी या सुनावणीसाठी निवृत्तीपूर्वी खूप कमी दिवस मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात हेच खंडपीठ राहिल का? याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण होणारी ही एक घडामोड आहे.
४ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होईल. पुढचा आठवडा म्हटल्याने आठवड्यातील पहिला वार म्हणजेच सोमवार (८ ऑगस्ट) रोजी होईल असं गृहीत धरलं जात होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर ही तारीख १२ ऑगस्ट देण्यात आली आहे.
सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धाकधूक वाढवणारी घटना आहे. जितकी सुनावणी लांबणीवर पडेल तितकेच शिवसेनेसाठी अवघड होत जाईल असं म्हटलं जात आहे.