Over 300 Chinese soldiers clashed at Tawang flashpoint, received more injuries than Indian side : अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमध्ये शुक्रवार 9 डिसेंबर 2022 रोजी चीन आणि भारताच्या सैनिकांची झटापट झाली. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले. एएनआयच्या वृत्तानुसार भारतापेक्षा चीनच्या जखमी सैनिकांची संख्या मोठी आहे. अद्याप या प्रकरणात भारताच्या लष्कराकडून तसेच संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. सूत्रांनी झटापटीचे वृत्त दिले आहे.
चीनचे 300 सैनिक मोठी तयारी करून आले होते. पण भारत त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तयार होता. भारताकडून एवढा प्रतिकार होईल याची कल्पना चीनने केली नव्हती. यामुळेच चीनचा अंदाज चुकला आणि त्यांचे अनेक सैनिक जखमी झाले असे वृत्त एएनआयने दिले आहे.
झटापट झाल्यानंतर भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढला. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक झाली. कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या ध्वज बैठकीत (फ्लॅग मीटिंग) दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची तयारी दाखविल्याचे समजते.
भारत आणि चीन यांच्यात 2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर तवांगमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. या झटापटीत जखमी झालेल्या भारताच्या सहा सैनिकांना उपचारासाठी गुवाहाटी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गलवानमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते तर चीनच्या 45 पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाला होता.
तवांग सेक्टरमधील भूभागाबाबत भारत आणि चीनचे स्वतंत्र दावे आहेत. दोन्ही देश ज्या भागावर दावा करतात त्या भागात गस्तीसाठी सैनिक नियुक्त करतात. पण तवांगमध्ये यावेळी दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले त्यावेळी तणाव वाढला आणि हिंसक झटापट झाली.
IND vs BAN : फक्त एकाच पद्धतीने भारत WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो, केएल राहुलने दिली महत्त्वाची माहिती
अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात Line of Actual Control - LAC ही भारत आणि चीन या दोन देशांदरम्यानची 4057 किमी लांबीची सीमारेषा आहे. ही रेषा भारताच्या लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना लागून आहे तसेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतून जाते. ही रेषा सर्वमान्य आंतरराष्ट्रीय सीमा नाही. तणाव निर्माण होऊ नये यासाठी तत्कालीन परिस्थितीत दोन्ही देशांच्या सैन्याने स्वीकारलेली ही परिस्थिती आहे. पण दोन्ही देशांचे भूभागाबाबत स्वतंत्र दावे आहेत.