SC Decision On ECI Appointments : निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्त (EC) यांची नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सीबीआय प्रमुखांच्या धर्तीवर मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एक समिती स्थापन करावी, ज्यामध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. या समितीने राष्ट्रपतींकडे नावाची शिफारस करावी. राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करावी. (Panel of Election Commissioner appointed by PM, Leader of Opposition, CJI, Supreme Court decision)
अधिक वाचा : Pune Kasba Peth, Pimpri-Chinchwad By Election Result 2023 : कसब्यात काँग्रेसचा झेंडा, रवींद्र धंगेकर विजयी
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय त्या याचिकांवर दिला आहे, ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारखी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती.
न्यायमूर्ती केएम जोसेफ, न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी खंडपीठाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला होता.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी पंजाब केडरचे आयएएस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. अरुण गोयल यांच्या नियुक्तीवर वाद निर्माण झाला कारण ते ३१ डिसेंबर २०२२ रोजी निवृत्त होणार होते. 18 नोव्हेंबर रोजी त्यांना व्हीआरएस देण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यावर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला की, ज्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ते एक दिवसापूर्वीपर्यंत केंद्र सरकारमध्ये सचिव दर्जाचे अधिकारी होते. अचानक त्यांना व्हीआरएस देऊन एका दिवसात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.
अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामणी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, सध्याची व्यवस्था दीर्घकाळापासून कार्यरत आहे. निवडणूक आयोगातील आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सचिव स्तरावरील सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची यादी तयार केली जाते. या नावांचे एक पॅनल तयार केले जाते जे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाठवले जाते. या पॅनेलमध्ये पंतप्रधान कोणत्याही एका नावाची शिफारस करतात. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी घेतली जाते.