Ranil Wickremesinghe : भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत सध्या मोठे आर्थिक संकट सुरू आहे. या संकटातून सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असलेल्या श्रीलंकेत एक मोठा निर्णय झाला आहे. गोटाबाया राजपक्षा यांनी देश सोडला आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. यानंतर नव्या राष्ट्रपतींसाठी श्रीलंकेत निवडणूक झाली. या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. । श्रीलंका
श्रीलंकेतील लोकांच्या भंयकर रागाचं नेमकं कारण घ्या समजून
निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे यांना १३४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुल्लास अल्हापेरूमा यांना ८२ मते मिळाली. निवडणूक जिंकल्यामुळे रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली.
श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर देशाला आर्थिक संकटातून सावरण्याचे एक मोठे आव्हान आहे. सध्या श्रीलंकेकडे मर्यादीत परकीय चलनसाठा आहे. भारताकडून लंकेला उधारीवर अन्न, औषधे, तेल यांचा पुरवठा सुरू आहे. भारताकडून घेतलेल्या मालाचे पैसे श्रीलंकेला लवकरच द्यायचे आहेत. पण भारत सरकारने रुपया हे चलन आंतरराष्ट्रीय बाजारात विनिमयासाठी उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात थेट भारतीय रुपयात व्यवहार होण्याची शक्यता आहे. श्रीलंका भारतीय रुपयात व्यवहार करून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक ते नियोजन श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वात होईल, अशी चिन्हं आहेत.
याआधी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हापेरूमा आणि सजिथ प्रेमदासा हे तिघे रिंगणात होते. निवडणूक होण्याआधी सजिथ प्रेमदासा यांनी माघार घेतली. यानंतर झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे यांना १३४ तर दुल्लास अल्हापेरूमा यांना ८२ मते मिळाली.
गोटाबाया राजपक्षा यांनी देश सोडला यानंतर रिक्त झालेल्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदावर रानिल विक्रमसिंघे यांची नियुक्ती झाली. निवडणूक होऊन नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती होते. संसदेत पार पडलेल्या निवडणुकीत बहुसंख्य संसद सदस्यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला. यानंतर श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर औपचारिक निवड झाली. लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकून राष्ट्रपती झालेले रानिल विक्रमसिंघे आता देशाची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसविण्यासाठी काम करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.