नवी दिल्ली: शिवसेना नेते (Shiv Sena leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संघप्रमुखांच्या अखंड भारतावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणी अखंड हिंदुस्थानबद्दल बोलत असेल तर त्यांना आधी पीओके (Pok)आणि भारताशी जोडावे लागेल, त्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणीत गेलेला भागही भारताशी जोडावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. परंतु यासाठी पंधरा वर्षाचा मुदत न मागता पंधरा दिवस दोन वर्षाची मुदत घ्या, असंही राऊत म्हणाले.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारी हरिद्वार येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आणि श्री गुरुत्रय मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते, त्यावेळी त्यांनी अखंड भारताविषयी वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'पूर्वी जिथे भारताच्या सीमा होत्या, त्याही जोडा, श्रीलंकाही जोडा आणि मग मोठी शक्ती बनवा, तुम्हाला कोणी अडवले नाही. पण त्याआधी काश्मिरी पंडितांना मायदेशी परत आणा आणि जर तुम्ही हे केले तर आम्ही तुम्हाला नक्कीच पाठिंबा देऊ, असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना डिवचताना म्हटलं की, वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी केली. अखंड हिंदुस्तानचं स्वप्न कोण नाही पाहत. वीर सावकर, बाळासाहेब ठाकरे यांनीही याचे स्वप्न पाहिलं होतं त्यामुळे आधी स्वातंत्र्यवीर सावरकारांना भारतरत्न द्या, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
मोहन भागवत यांचे अखंड भारताबाबतचे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. येत्या 15 वर्षात देश अखंड भारत होईल असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सनातन धर्माला विरोध करणाऱ्या तथाकथित लोकांचेही त्यात सहकार्य असल्याचे संघप्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले होते. अशा लोकांनी विरोध केला नसता तर हिंदू जागे झाले नसते, असेही ते म्हणाले. भारत जागा होईल तर तो धर्मानेच उठेल. धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच भारताचा उदय होईल, असे भागवत म्हणाले.