नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील (West Bengal) कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांचा (Governor) अहवाल (Report) आल्यानंतर संविधानातील (Constitution) तरतुदीनुसार निर्णय होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah, Home Minister of India) म्हणाले. त्यांनी सीएनएन न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. (west bengal decision will be taken as per constitution said home minister amit shah)
पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांचे सरकार (state government) राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप पश्चिम बंगाल भाजपने केला आहे. भाजपच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. याच कारणामुळे भाजपने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात बोलताना अमित शहा यांनी भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात काहीच चुकीचे नाही, असे सांगितले.
भाजपच्या पश्चिम बंगालमधील नेत्यांनी ममता बॅनर्जी सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था राखू शकत नसल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बॉम्ब निर्मिती सुरू आहे. भ्रष्टाचार वाढत आहे. राज्याची परिस्थिती वाईट आहे. सरकार असूनही राज्यात विरोधकांच्या हत्या होणे, विरोधकांना मारहाण होणे असे प्रकार सुरू आहेत. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखूच शकत नसेल तर त्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी हिंसक कारवाया करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने केली आहे. या प्रकरणात राज्यपालांचा पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबाबतचा अहवाल आल्यानंतर संविधानातील तरतुदीनुसार निर्णय होईल, असे अमित शहा म्हणाले.
कायदा सुव्यवस्था बिघडणे, राजकीय हत्या होणे, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर बनावट पोलीस तक्रारी आणि कोर्ट केस दाखल होणे असे प्रकार एखाद्या राज्यात घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने अशा परिस्थितीत संविधानातील तरतुदीनुसार निर्णय घ्यावे लागतील, असे अमित शहा यांनी सांगितले.
अम्फान वादळाने पश्चिम बंगालला मोठा तडाखा दिला. यानंतर केंद्र सरकारने पश्चिम बंगालला तातडीने मोठी आर्थिक मदत दिली. कोरोना संकट आणि अम्फानचा तडाखा या दुहेरी अडचणींचा विचार करुन पश्चिम बंगालला धान्य, डाळींच्या स्वरुपात मोठी मदत देण्यात आली. तसेच आर्थिक मदत देण्यात आली. पण भ्रष्टाचार झाला. केंद्राने ज्या हेतूने मदत दिली तो हेतू साध्य झाला नाही. अडचणीत सापडलेल्यांच्या हालअपेष्टा आणखी वाढल्या. कोरोना संकट हाताळण्याच्या बाबतीतही पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला. त्यांनी पश्चिम बंगालमधील परिस्थिती सुधारणे आवश्यक असल्याचे सांगितले.