Arm forces press conference on Agnipath Scheme : नवी दिल्ली : सैन्यदलात भरतीसाठी नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेमुळे वाद निर्माण झाला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या योजनेविरोधात निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत तरुणांच्या अनेक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी अग्निवीरांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची ग्वाही दिली. भूदल, नौदल आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही पत्रकार परिषद घेतली होती. सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. (What is the need of Agnipath scheme? arm forces explained in press conference)
लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी म्हटले की काही कोचिंग क्लासवाले तरुणांना भडकवून प्रदर्शने घडवून आणत आहेत. ज्या तरुणांना अग्निपथ योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांना ही प्रतिज्ञा घ्यावी लागेल की ते कोणत्याही प्रदर्शनात किंवा हिंसाचारात सहभागी झालेले नाहीत. पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय कोणीही सैन्यात भरती होऊ शकत नाही. त्यामुळेच निदर्शने करणाऱ्या तरुणांना आमचे सांगणे आहे की त्यांनी निदर्शनात वेळ वाया घालवू नये.
सैन्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की एकदा सैन्याशी जोडले गेल्यानंतर सैन्य त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. भारतीय सैन्यदले आपल्या सैनिकांची नेहमी काळजी घेतात. अग्निवीरांच्या बाबतीतदेखील हेच लागू होते. अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की सर्व भरती प्रक्रिया याच योजनेअंतर्गत होणार आहेत. 25,000 अग्निवीरांची पहिली बॅच डिसेंबर महिन्यात सैन्यात भरती केली जाईल.
लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पुढे सांगितले की देशसेवेत हौताम्य पत्करणाऱ्या अग्निवीरांना एक कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. सेवेतील अटींमध्ये अग्निवीरांशी भेदभाव केला जाणार नाही. सियाचेन आणि इतर ठिकाणच्या पोस्टिंगमध्ये या अग्निवीरांना त्याच सुविधा आणि भत्ते मिळतील ज्या इतर सैनिकांना मिळतात. सध्या जवानांना जे भत्ते मिळत आहेत त्यापेक्षा जास्त अग्निवीरांना मिळतील असे पुरी यांनी सांगितले.
अधिक वाचा : Agnipath recruitment schedule : लष्कर, नौदल, वायूदलाने जाहीर केले अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीचे वेळापत्रक
सैन्य व्यवहाराशी संबंधित विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट अरुण पुरी यांनी पुढे सांगितले की एक प्रश्न सारखा विचारला जातो आहे की चार वर्षानंतर काय? दरवर्षी तिन्ही सेवांमध्ये मिळून जवळपास 17,600 जवान वेळेआधीच निवृत्ती घेत आहेत. कोणीही त्यांना हे विचारले नाही की ते वेळेआधीच सेवानिवृत्ती का घेत आहेत. अग्नीवीरांना सेवानिवृत्तीनंतर अनेक सुविधा मिळतील.
सैन्यदलांमधील जवानांचे वाढते वय ही सैन्यासाठी चिंतेचे कारण असल्याचे मत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कारगिल समितीनेदेखील याकडे लक्ष वेधले असल्याचे अधिकारी म्हणाले. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि आधीचे सीडीएस यांनी इतर देशाच्या सैनिकांचे सरासरी वयाचा अभ्यास केला. अग्निपथ योजना आणण्यापूर्वी खूप अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यावर चर्चा करण्यात आली आहे.
अधिक वाचा : Breaking News : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनं घेतला पेट, पाहा Video
सध्याच्या काळात युद्धाचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. युद्ध आता तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. त्यामुळेच आपले जवान त्यासाठी तयार असावेत अशी आवश्यकता आहे, असे मत सैन्य अधिकाऱ्यांनी यावेळी मांडले.
अग्निपथ योजना मागे घेतली जावी यासाठी देशातील अनेक राज्यात निदर्शने केली जात आहेत. यासंदर्भात बोलताना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अग्निपथ योजना परत घेण्याची आवश्यकता नाही आणि ही योजना परत घेतली जाणार नाही. ही योजना आत्ताच का लागू केली तर कोरोना महामारीच्या संकटानंतर ही योजना लागू करण्याची हीच योग्य वेळ आहे. सैन्यदलांमधील सुधारणांची प्रक्रिया 1989 पासून सुरू आहे. सैन्यदलांतील जवानांचे सरासरी वय सध्या 32 असून ते 26 वर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
नौदल मुख्यालय 25 जूनपर्यंत भरतीसाठी विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. भर्तीची पहिली तुकडी 21 नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होईल. वायूदलाच्या भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल. वायूदल 30 डिसेंबरपर्यंत भरतीच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू करण्याचा विचार करते आहे.