नवी दिल्ली : देशात नवीन राष्ट्रपती (President) निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लवकरच राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून येत्या तीन दिवसांत अधिसूचना जारी केली जाऊ शकते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर, उमेदवार त्यांच्या बाजूने मते मागण्यासाठी सर्व राज्यांना भेटी देतात. यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग नसून निवडून आलेले लोकप्रतिनिधी भाग घेतात, त्यामुळे त्यात नवीन समीकरणे निर्माण होण्याची आणि बिघडण्याची शक्यता असते.
शेवटच्या वेळी 17 जुलै 2017 रोजी नवीन राष्ट्रपती निवडण्यात आले होते. तेव्हा जवळपास पन्नास टक्के मते एनडीएच्या बाजूने होती, तसेच प्रादेशिक पक्षांतील बहुतांश पक्षांचा पाठिंबा होता. यावेळीही काही प्रादेशिक पक्षांच्या मदतीने एनडीए आपल्या मर्जीतील राष्ट्रपती निवडण्याच्या जवळ आहे. मात्र, येत्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर त्याचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
खासदारांच्या मतांच्या मूल्याचे गणित वेगळे असते. सर्व प्रथम, सर्व राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. आता हे एकत्रित मूल्य राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशाप्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते.
आमदाराच्या बाबतीत, ज्या राज्यातील आमदार आहे त्या राज्यातील लोकसंख्या पाहिली जाते. यासोबतच त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्याही विचारात घेतली जाते. मूल्य मोजण्यासाठी, राज्याची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येने भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला 1000 ने भागले जाते. आता जो आकडा उपलब्ध आहे तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचे मूल्य आहे.
या निवडणुकीत मतदान एका विशिष्ट पद्धतीने केले जाते, ज्याला एकल हस्तांतरणीय मतदान प्रणाली म्हणतात. म्हणजेच मतदार एकच मत देतो, पण तो सर्व उमेदवारांमध्ये आपला प्राधान्यक्रम ठरवतो. म्हणजेच त्याची पहिली पसंती कोण आणि दुसरी, तिसरी कोण हे तो मतपत्रिकेवर स्पष्ट करत असतो. पहिल्या पसंतीच्या मतांवरून विजेते ठरले नसल्यास, मतदाराची दुसरी पसंती नवीन एकल मत म्हणून उमेदवाराच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. म्हणून त्याला एकल हस्तांतरणीय मत म्हणतात.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून विजय निश्चित होत नाही. राष्ट्रपती तोच होतो. ज्याला मतदारांच्या म्हणजे खासदार आणि आमदाराच्या एकूण मतांच्या निम्म्याहून अधिक मत मिळते. सध्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये सदस्यांच्या मतांचे एकूण वेटेज 1098882 आहे. विजयासाठी उमेदवाराला 549441 मते मिळवावी लागतील.
गेल्या चार वेळेपासून उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती करण्याची परंपरा खंडित झाली आहे. उपराष्ट्रपतीपदावरुन कृष्णकांत आणि भैरोसिंग शेखावत यांना राष्ट्रपतीची संधी मिळालेली नाही. याआधी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाले. दोन वेळा उपराष्ट्रपती राहिलेल्या हमीद अन्सारी यांना दोन्ही वेळा राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली नाही.