SC says submissions likely to be completed by Oct 18 in Ayodhya case नवी दिल्लीः अयोध्या राम मंदिर प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर देण्याचे संकेत सुप्रीम कोर्टानं दिलेत. सुप्रीम कोर्टानं बुधवारी अयोध्या जमीन वाद प्रकरणात सर्व पक्षकारांना आपला युक्तीवाद मांडण्यासाठी मुदत दिली आहे. कोर्टानं सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत आपला युक्तीवाद पूर्ण करण्यासाठी सांगितलं आहे.
भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं की, या प्रकरणी सुनावणी संपण्यासाठी तारखांच्या अंदाजानुसार आम्ही सांगू शकतो की, 18 ऑक्टोबरपर्यंत सादरीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोर्टानं म्हटलं की, अयोध्या प्रकरणातली सुनावणी खूप पुढे गेली आहे. त्यासाठी रोजच्या आधारावर कारवाई सुरूच राहिल.
रंजन गोगोई यांनी म्हटलं की, आम्ही सर्व 18 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी समाप्त करण्यासाठी एक संयुक्त प्रयत्न करू. तसंच कोर्ट सुनावणीसाठी एक तास वाढवू सुद्धा शकते. आवश्यकता पडल्यास शनिवारी सुद्धा कोर्ट सुरू राहिल आणि सुनावणी पूर्ण करण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टानं सर्व पक्षकारांना त्यांचा युक्तिवाद किती दिवसात पूर्ण होईल? असा सवाल उपस्थित केला. त्यावर सुन्नी वक्फ बोर्डानं युक्तिवादासाठी जास्तीत जास्त एक आठवडा लागेल अशी म्हटलं. त्यावर रामललाच्या वतीनं युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी दोन दिवस लागतील अशी माहिती दिली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाडानं पत्र लिहून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजं असं मत देखील व्यक्त केलं.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. यासाठीच गोगोई यांच्या निवृत्त होण्याआधी अयोध्या प्रकरणी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. गोगोई यांनी म्हटलं की, आम्हाला निर्णय लिहण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी हवा आहे.
रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं असंही म्हटले आहे की, सुनावणीबरोबरच मध्यस्थी प्रक्रिया सुरू राहू शकते आणि जर त्यातून सुलभ तोडगा निघाला तर तो सुप्रीम कोर्टात दाखल होऊ शकतो. पक्ष मध्यस्थीच्या माध्यमातून अयोध्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तयार असतील तर, ते तसं सुद्धा करू शकतात.