श्रीनगर: भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना (security forces) आज (गुरुवार) पहाटे मोठं यश मिळालं. कारण एका ट्रकमध्ये लपून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या चारही दहशतवाद्यांना चकमकीदरम्यान सुरक्षा दलाने कंठस्नान घातलं आहे. (4 terrorists killed) हे चार दहशतवाद्यांना ठार केल्याने सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. जम्मू-श्रीनगर (jammu-Srinagar) महामार्गावरील नगरोटाजवळील बन टोल प्लाझाजवळ ही चकमक झाली. ताज्या माहितीनुसार, चकमकीनंतर पोलिसांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला आहे. तसेच सुरक्षा दलाने हा संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे आणि येथील सुरक्षा वाढविली आहे.
नगरोटाच्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर उधमपूरमध्ये देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. एकाच वेळी चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याने सुरक्षा दलासाठी हा मोठा विजय समजला जात आहे.
टोल प्लाझाजवळ झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर नगरोटामधील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. प्रवाशांवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. पोलिसांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग देखील बंद केल्याची माहिती समोर आली आहे. चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या जवानांची प्रकृती स्थिर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, याबाबत अशी माहिती मिळाली की, सुरक्षा दलाचे जवान हे टोल प्लाझाजवळ बॅरिकेट्स लावून वाहनांची तपासणी करत होते. तेव्हा अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी सतर्क असलेल्या जवानांनी देखील दशहतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर हे चारही दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून जात असतानाच त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी टिपलं.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही दहशतवादी हे एका ट्रकमधून काश्मीर खोऱ्याच्या दिशेने जात आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, नगरोटाजवळ दहशतवादी लपलेला ट्रक पकडण्यात आला. यावेळी सुरक्षा कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यावेळी ट्रकमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.