आज फैसला होण्याची शक्यता, कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार?

Karnataka Politics: कर्नाटकमध्ये असलेल्या काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार सत्तेत राहणार की नाही या संदर्भात आज फैसला होण्याची शक्यता आहे. पाहूयात सविस्तर वृत्त...

Kumarswamy
कुमारस्वामी सरकार  |  फोटो सौजन्य: PTI
थोडं पण कामाचं
  • सत्ता वाचवण्यासाठी कुमारस्वामींचा प्रयत्न
  • सोमवारचा दिवस कुमारस्वामी सरकारचा अखेरचा दिवस - भाजप
  • मायावतींनी आपल्या एकमेव आमदाराला दिला 'हा' आदेश

बंगळुरू: कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार सत्तेत राहणार की नाही याचा फैसला सोमवारी (२२ जुलै) विधानसभेत होणार आहे. आघाडीमधील आमदारांनी राजीनामा दिल्याने एच.डी. कुमारस्वामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली आहे. कुमारस्वामी सरकारला १९ जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र, विश्वासदर्शकाय्या संबंधित सुरू असलेली चर्चा लांबली आणि त्यामुळे मतदान झालं नाही. अखेर आता सोमवारी (२२ जुलै) विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाणार आहे.

तर बसपा प्रमुख मायावती यांनी देखील या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे. मायावती यांनी कर्नाटकातील आपल्या एकमेव आमदाराला सत्ताधारी सरकारला मतदान करण्यास सांगितलं आहे. या संदर्भात मायावती यांनी ट्विटही केलं आहे. सत्ता वाचवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रयत्न करत आहेत. कुमारस्वामी आणि काँग्रेस पक्षाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आरोप केला होता की, विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असताना राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप केला.

शुक्रवारी दुपारी दीड वाजता बहुमत सिद्ध करण्याचं ठरलं होतं. मात्र, विधानसभेत चर्चा सुरूच राहिली आणि विधानसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली. सत्तेत असलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने राज्यपालांच्या कार्यावर आक्षेप घेतला आहे. तर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सत्ताधारी पक्षाला सोमवारी बहुमत स्पष्ट करण्यासं सांगितलं आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत बहुमत स्पष्ट करण्यास अधिक वेळ न घेण्याचंही म्हटलं आहे.

विश्वासदर्शक ठरावावर सत्ताधारी पक्षाकडून आमदारांना बोलण्याची संधी देण्यात यावी यासाठी कुमारस्वामी आग्रही आहेत. त्यामुळे सोमवारी सुद्धा विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जर सोमवारी सुद्धा सत्ताधारी पक्षाकडून मतदान टाळण्याचा प्रयत्न केला तर सर्वांच्या नजरा या राज्यपालांच्या पुढील निर्णयाकडे असतील.

दरम्यान कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी रविवारी दावा केला की कुमारस्वामी सरकारचा सोमवारी शेवटचा दिवस असणार आहे. येदियुरप्पा यांनी म्हटलं, मला विश्वास आहे की, सोमवारी कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस असेल. सत्ताधारी विनाकारण वेळ वाया घालवत आहेत. सत्ताधाऱ्यांना माहिती आहे की, आमदारांना जारी करण्यात आलेल्या व्हिपचा काहीही उपयोग नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्ट आदेश दिले आहेत की, मुंबईत असलेल्या १५ आमदारांना विधानसभेच्या कार्यवाहीत सहभागी होण्यास कुठल्याही प्रकारची सक्ती केली जावू नये.

भाजपने आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. आता सोमवारी भाजप काय राजकीय खेळी खेळतं हे पहावं लागेल. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, जर बहुमत सिद्ध करण्यास आणखीन वेळ लागला तर भाजप राज्यपालांकडे जाईल इतकचं नाही तर न्यायालयातही धाव घेईल. येदियुरप्पा यांनी यापूर्वीच दावा केला आहे की काँग्रेस-जेडीएस सरकारकडे केवळ ९८ आमदार आहेत आणि त्यांनी बहुमत गमावलं आहे. तर भाजपकडे १०६ आमदार आहेत आणि सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीतही आहे. काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. तसेच दोन अपक्ष आमदारांनी सुद्धा सरकारचा पाठींबा काढला असून आता भाजपला समर्थन देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी