चेन्नई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ निवार (Cyclone Nivar) हे आता तामिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकू लागलं आहे. याचा परिणाम पुद्दुचेरीमध्ये दिसून येतो आहे. कारण तेथील समुद्रात आता जोरदार लाटा उसळत आहेत आणि प्रचंड उंचीच्या या लाटा किनाऱ्यावर खूपच वेगाने आदळत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यासंदर्भात हवामान खात्याने आधीच इशारा दिला आहे. तसेच मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
एनडीआरएफ तैनात
हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागात मंगळवार ते गुरुवारदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक ठिकाणी एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वीच १२ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर १८ अतिरिक्त टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत. मदत कार्य आणि बचाव कार्यांसाठी स्थानिक संघटनांशी समन्वय साधून हे पथक तैनात केले जाणार आहेत. या भागातील स्थानिक लोकांना तेथून बाहेर काढण्यासाठी ही पथकं मदत करणार आहेत.