Nitish Kumar: नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे यासोबतच भाजपसोबतची युतीही त्यांनी तोडली आहे. एकीकडे ही युती तोडत असतानाच त्यांनी लगेचच दुसरीकडे नवीन सरकार स्थापनेचा दावाही राज्यपालांकडे केला आहे. मात्र, हे सरकार आरजेडी, काँग्रेस आणि लेफ्टच्या एकूण १६० आमदारांच्या समर्थनासह बनवण्यात येत आहे. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. २०१७ मध्ये जे घडले ते विसरून जा आणि नवा अध्याय सुरू करू असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
असं म्हटलं जात आहे की, नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाचा चेहराही नितीश कुमारच असतील.
मात्र, हे तितके सोपे नाहीये. कारण, काँग्रेसचे राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि आता नितीश कुमार हे सर्वच पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नावे आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी हे एकटेच आहेत. त्यामुळे नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार की विरोधी पक्षांतील भांडण आणखी वाढणार? हे वेळेच सांगेल.