IAS टीना डाबी यांचा Action Plan आला समोर, पाकिस्तानातील विस्थापित हिंदूंच्या मदतीसाठी उचललं हे मोठं पाऊल

Jaisalmer Collector Tina Dabi: जैसलमेरमध्ये पाकिस्तानातून विस्थापित हिंदूंच्या बेकायदेशीर घरावर बूलडोझर फिरवल्यानंतर, जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी आता त्यांना मदत करण्याच काम हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांनी Action Plan तयार करायला सुरुवात केली आहे.

Updated May 19, 2023 | 05:03 PM IST

Tina dabi

जिल्हाधिकारी टिना डाबी यांनी पाकिस्तानातील हिंदू विस्थापितांसाठी उचलले आणखीन एक पाऊल

फोटो साभार : Times Now Digital
Tina Dabi Action Plan: पाकिस्तानातून जैसलमेर येथे स्थलांतर करून आलेल्या हिंदूची घरे उद्ध्वस्त करून चर्चेत आलेल्या जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी टीना दाबी यांचा नवा अॅक्शन प्लॅन समोर आला आहे. आता त्यांनी विस्थापित हिंदूच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. यासाठी टीना डाबी यांनी कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. टीना डाबी यांनी पाकिस्तानातून विस्थापित हिंदू कुटुंबांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली असून सध्या या लोकांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे.
विस्थापित पाकिस्तानी हिंदू कुटुंबांना स्थायिक करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे,जी या कुटुंबाला स्थायिक करण्यासाठी योग्य ती जागा बघून देईल. टीना दाबी यांनी सांगितले की, निर्वासित पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्य करत असून त्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. यासोबतच पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंशीही चर्चा करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानंतर चालवण्यात आला बुलडोझर

जेसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानंतर यूआयटीने पोलिसांच्या मदतीने पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांची घरे बुलडोझर चालवून उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्यामुळे या सर्व विस्थापित हिंदूंचा संसार उघड्यावर पडला होता. याबद्दलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते, टीना डाबी यांना देखील त्यामुळे लोकांचा रोष पत्करावा लागला होता.
पाकिस्तानातील स्थलांतरीत हिंदूचे घर बुलडोझरचा वापर करून उद्ध्वस्त केल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी याला मानवतेच्या क्रूर मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं आहे, तर माजी प्रदेशाध्यक्ष अरुण चतुर्वेदी यांनी पाकिस्तानी परप्रांतीयांचा छळ थांबला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राजेंद्र राठोड म्हणाले की, पाकिस्तानात हिंदूंच्या श्रद्धा आणि सन्मानावर हल्ला करण्यात आल्यामुळे, ही लोकं राजस्थानमध्ये आश्रय घेण्यासाठी आले आहेत. अशावेळी ते सरकारकडे मदत मागत असताना अधिकाऱ्यांनी त्यांची घरे उद्ध्वस्त केली आहे. दारिद्र्यरेषेखालील या हिंदू विस्थापितांची घरे आधी जोधपूरमध्ये आणि आता जैसलमेरमध्ये पाडण्यात आली आहेत. सरकारी नोकरशहांचे हे काम माणुसकीच्या क्रौर्याची परिसीमा ओलांडणारे आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष अरुण चतुर्वेदी म्हणाले की, पंतप्रधान मोदी सीएए कायदा आणत आहेत. एकीकडे सरकार पाकिस्तान, बांगलादेश तसेच इतर देशांतील भारतात येत असलेल्या हिंदू स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी दार उघडण्याचे काम करत आहेत. तर दुसरीकडे, राजस्थान सरकारच त्यांना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बेघर करत आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तब्बल ३० वर्षांनंतर असे मोठ्या संख्येने हिंदू विस्थापित झाले आहेत. त्यांच्या मुलांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे, मात्र नागरिकत्व नसल्याने त्यांना पदवी मिळत नाही. त्यांच्यावर अत्याचार करून राज्य सरकार पाकिस्तानच्या दडपशाहीप्रमाणे वागत आहे. हे कोणत्याही प्रकारे मान्य नाही. त्यांचा छळ थांबला नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited