Congress arise question on ED action against Sanjay Raut: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीची टीम दाखल झाली. त्यानंतर तब्बल ९ तासांनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या या ईडीच्या कारवाईवर काँग्रेस नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच काही शंकाही उपस्थित केली आहे. (Ed action against sanjay raut over this congress has raised questions)
संजय राऊत यांच्यावर सुरू असलेल्या करवाईबाबत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी भाजपला निशाण्यावर घेत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांवर केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि राज्यपाल कोशारी यांच्यावर जे शिंतोडे उडत आहे त्यातून निसटण्यासाठी राऊतांवर कारवाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
भाजपा ED वर दबाव आणून राजकारण करत आहे, मात्र भाजपाच हे राजकारण जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे. त्यामुळे त्यांच्या अश्या राजकारणाला येणाऱ्या काळात जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
अधिक वाचा : संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाल्यानंतर शिंदे गटाला आनंद गगनात मावेना; 'या' नेत्यानं दिली ही प्रतिक्रिया
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, भारतीय जनता पार्टीच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संवैधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जे कोणी बोलेल त्याच्या विरोधात केंद्रिय तपास यंत्रणा लावल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
वास्तविक पाहता मोदी सरकार हे इंग्रजांच्या धोरणाची अंमलबजावणी करत असून संजय राऊत यांना ब्लँकमेल करण्यासाठी ही कारवाई होत आहे. मात्र यांनी कितीही अन्याय केला तरी जनतेला सर्वत्र माहिती आहेच त्यामुळे येणाऱ्या काळात जनताच भाजपा सरकारला योग्य धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.