शिर्डी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी (Temple reopnes) दिली आहे. दिवाळी पाडव्या (Diwali Padwa)पासून राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिकस्थळे उघडण्यात येणार आहेत. मंदिरे उघडण्यासाठी सर्वच धार्मिक संस्थानांनी खास तयारी केली असून भाविकांना सुरक्षित आणि गर्दी न करता योग्य पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी उपाययोजना करुन नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानने (Shirdi Sai Baba Temple Sansthan Trust) सुद्धा भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. पाहूयात कशी आहे ही नियमावली.
धार्मिकस्थळे उघडण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर आता राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. भाविकांना कोविड संबंधित सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वत:बरोबर इतरांचे रक्षण करा.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!.