11 died during maharashtra bhushan award ceremony due to heatstroke : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे पार पडला. याप्रसंगी चार ते पाच तास उन्हात बसल्याने अकरा श्री सदस्यांचा मृत्यू झाला. श्री सदस्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगण्यात आले. उष्माघाताने झालेल्या अकरा मृत्यू व्यतिरिक्त अनेकांना वैद्यकीय उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
उष्माघाताने मृत्यू झालेल्या 11 पैकी 8 सदस्यांची नावं प्रशासनाने जाहीर केली आहेत. श्रीमती वायचळ, तुकाराम वांगडे, महेश गायकर, मंजुषा भाबंडे, स्वप्नील केणे, संगीता पवार, जयश्री पाटील, भीमा साळवी अशी ही नावं आहेत. सर्व अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांचा खर्च राज्य शासन करणार आहे.
बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी "हरवले व सापडले" समितीचे प्रमुख (संपर्क क्रमांक : 7977314031) आणि तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडे संपर्क (संपर्क क्रमांक : 022-27542399) साधावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रात्री उशिरा अकरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जातील.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईमध्ये रविवारी 37 अंश सेल्सिअस तापमान होते. हवेत आर्द्रता जास्त होती. अलोट अशी गर्दी कार्यक्रमाच्या ठिकाणी झाली होती. यामुळे उष्णता आणि आर्द्रता जास्त जाणवत होती. अमित शहा यांनी आपल्या भाषणात तापमान 42 अंशांच्या आसपास असल्याचा उल्लेख केला होता. या वातावरणात रणरणत्या उन्हात डोक्यावर छप्पर नसताना तासनतास बसून राहिल्यामुळे अनेकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. कार्यक्रमाला लाखो नागरिक खारघरच्या सेंट्रल पार्कवर जमले होते. कार्यक्रम सकाळी 10 च्या सुमारास सुरू झाला आणि दुपारी 2 पर्यंत सुरू होता. याच कारणामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला.
छान किती दिसती साराच्या या अदा