Aurangabad and Osmanabad rename as Chhatrapai Sambhaji Nagar and Dharashiv: औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' होणार आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! pic.twitter.com/IfXbdFec7r
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर' व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आठ महिन्यांपूर्वी युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळातदेखील ठराव संमत झाला होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की हे ऐतिहासिक पाऊल असून राज्यातील जनता केंद्र सरकारची आभारी आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास 16 जुलै 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.
हे पण वाचा : कमी तेलात अशी बनवा कुरकुरीत भजी
त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अन्वये शासकीय ठरावात औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ' अशा नावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
हे पण वाचा : सासरवाडीत वापरा या टिप्स, सासू झटक्यात होईल इम्प्रेस
यानंतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधानमंडळाचा ठराव करण्यात आला. आता राज्य सरकारच्या या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
शहरांच्या नामांतराचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतो. केंद्र सरकारने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे.