मुंबई : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध संत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदौर कोर्टाने शुक्रवारी निकाल दिला. न्यायालयाने सर्व्हिसमन विनायक, केअर टेकर पलक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी राहत्या घरी लायसन्स रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. (Bhai Yuji Maharaj Suicide case: Court verdict, conviction of three and sentence of 6 years)
साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांसाठी जे सेवेदार कुटुंबापेक्षा जास्त होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी इतका त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास भाग पाडले.
याप्रकरणी १९ जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल २८ जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.
आरोपी विनायकच्यावतीने अधिवक्ता आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकारच्या वतीने शरद आणि विनायक यांच्यात अंतिम चर्चा झाली होती. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर असलेली संपत्ती नाही, असा युक्तिवाद विनायकच्या वकिलाने केला. त्यामुळेच त्याला गोवण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात ३० हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.